छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकारणात सत्तांतरानंतर आता कुरघोडीचे प्रकार सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या महायुती सरकारमध्ये नव्याने झालेले शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात येत्या काळात संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत. मंत्री झाल्यानंतर शिरसाट यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जमीन बळकावणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या आणि जिल्हा नियोजन समितीतील निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला.
शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा इशारा अप्रत्यक्षरित्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना होता. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आता जिल्ह्यात नव्याने आपल्या सर्वपक्षीय समर्थकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षातील नाराजांचा कानोसा ते घेत आहेत.
नुकतीच अब्दुल सत्तार यांनी पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांची रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधीच विलास भुमरे यांचा राहत्या घरी भोवळ येऊन पडल्याने अपघात झाला होता. मोठ्या प्रमाणात दुखापत आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे भुमरे यांना आमदार पदाची शपथ घेता आली नाही. आणखी काही दिवस भुमरे यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, निवडणुकीची धामधूम, निकालानंतर मुंबईत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आणि त्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनामुळे भुमरेंच्या भेटीला अब्दुल सत्तार जाऊ शकले नव्हते. शिवाय मंत्रीपदाच्या शर्यतीत सत्तार असल्याने त्यांना भुमरेंच्या भेटीला वेळ मिळाला नव्हता. अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात मेळावा घेतल्यानंतर सत्तार यांनी आता जिल्ह्यात समर्थकांच्या भेटीगाठी घेत वेगळ्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री राहिलेल्या संदीपान भुमरे यांच्या वाट्याचे मंत्रीपद फडणवीसांच्या सरकारमध्ये संजय शिरसाट यांच्या वाट्याला गेले. भुमरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश शिरसावंद्य मानत छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याबदल्यात मुलाला आमदारकी आणि मंत्रीपदाचा शब्द मिळवला होती अशी चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात होती.
शिंदेंनी विलास भुमरे यांना पैठणमधून उमेदवारी तर दिली, पण मंत्रीपदावर शिरसाट यांची वर्णी लावली. त्यातच विलास भुमरे दुखापतीमुळे महिभाभरापासून रुग्णालयात उपचार घेत असल्याने अद्याप त्यांनी आमदार पदाची शपथच घेतली नाही. त्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीतून ते बाहेर फेकले गेले. संदीपान भुमरे यांचे एका अर्थाने राजकीय नुकसानच झाले, असे बोलले जाते. भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सत्तार यांना मिळावे, यासाठी भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तेव्हा शिफारस केली होती.
आमच्या दोघात तिसरा नको, अशी भूमिका भुमरेंनी घेतल्यामुळे तेव्हापासून शिरसाट-भुमरे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशावेळी सत्तार यांनी आमदार विलास भुमरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. या शिवाय वैजापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद या जिल्ह्यातील ग्रामीण भागात सत्तार येत्या काही दिवसात दौरे करून सर्वपक्षीय नाराजांच्या भेटी घेणार असल्याची माहिती आहे. 1 जानेवारी रोजी अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू आहे, त्यावेळी जिल्ह्यातील या सगळ्या सर्वपक्षीय नाराजांची मोट बांधून मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.