
Mumbai, 13 December : खासदार संजय राऊतांच्या बातम्यात तथ्य नसतं, तर तुम्ही त्यावर रिॲक्शन का देता? शिंदे गटाने राज्यात टक्केवारीचा बाजार मांडला आहे. संजय शिरसाट यांच्यासहीत सर्वांचा टक्केवारीचा बाजार समोर आणून दाखवायचा का? तुमचे सगळे टक्केवारीचे ऑडिओ-व्हिडिओ समोर आणायचे का?, असा गर्भित इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिला.
शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मानसिकता केवळ टक्केवारीची झालेली आहे, असा आरोप केला होता. त्याला अंबादास दानवे यांनी सडेतोड प्रत्युतर दिले आहे.
ते म्हणाले, महायुतीच्या मंत्रिमंडळासंदर्भात ज्या बातम्या येत आहेत. त्यावरून महायुतीमध्ये फार सलोख्याने मंत्रिमंडळ वाटप झाले असेल असे मला तरी वाटत नाही. शिवसेनेच्या अडीच अडीच वर्षे मंत्रिपदाच्या फार्म्युल्यावर दानवे यांनी टीका केली. कामगारांच्या जशा आठ आठ तासांच्या शिफ्ट असतात, त्याप्रमाणे त्यांनी मंत्रिपद वाटून घेऊ नये, म्हणजे झाले.
महाराष्ट्राचे हित पाहायचे आहे की स्वःहित पाहायाचे, हेच कळत नाही. महाराष्ट्रहिताची चर्चा खातेवाटपात होत असेल तर चांगलं आहे. पण, मलिदा कुठे जास्त मिळतो, असं खातं आपल्याला मिळावं, अशीच सर्वांची भावना दिसून येत आहे. ही दुर्दैवी आहे. भाजप स्वतःकडे महत्वाची खाते ठेवणारच आहे. कारण, त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गरज नाही, त्यांच्याकडे १४० ते १४२ एवढं संख्याबळ तयार आहे, असेही दानवे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पहिले देवेंद्र फडणवीस यायचे. आता बावनकुळे येत आहेत. यापुढे कोण येणार, हा प्रश्न आहे. पण, बावनकुळे दोनदा आले, मात्र, शिंदे त्यांचं ऐकतील, असं मला तरी वाटत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
त्या भेटीत कृत्रिमपणा
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे, त्यांचा काल वाढदिवस होता. राजकारणाच्या पलीकडे कुटुंब, व्यक्तिगत नातेगोत्याचे संंबंध असतात, ते पाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याला राजकारणाचा वास मला तरी येत नाही. पवार कुटुंबाचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. त्या भेटीकडे शिवसेनेने राजकीय चष्मातून बघावं, असं मला तरी वाटत नाही. यासारख्या घटनांवर पक्षात मंथन सुरू असतं. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे, एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. त्यामुळे त्या भेटीत कृत्रिमपणा दिसून येत होता. त्या दोघांची एकत्र येण्याची भूमिका मला दिसत नाही.
बीडच्या गुन्हेगारीला संरक्षण कोणाचे?
अंबादास दानवे म्हणाले, बीडमध्ये मस्साजोगचे सरपंचांचा खून ही हृदयाला वेदना देणारी घटना आहे. ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये गोळीबार झाला आहे. बीडमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. या गुन्हेगारीला संरक्षण कोण देतंय, असा सवाल यानिमित्ताने उपसस्थित होत आहे. बीडची जनता प्रचंड दबावात राहत असल्याची माहिती आहे.
परभणीची घटना टाळता आली असती
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमावबंदीचा आदेश लागू केला असता तर परभणीची घटना टाळता आली असती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो आहे. व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. या सर्व गोष्टी पाहता, समाजात अशांतता, भीती निर्माण करणारी टोळी कार्यरत आहे की काय, असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनात निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.