

नांदेडमधील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतील घटकांनी महाविकास आघाडीपेक्षा अशोक चव्हाण यांनाच लक्ष्य केले.
निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेसाठी शिवसेना व राष्ट्रवादीला भाजपशी बोलणी करणे अपरिहार्य ठरत आहे.
यामुळे नांदेडच्या राजकारणात नवी समीकरणे आणि युतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट झाला आहे.
Nanded News : नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीपेक्षा अशोक चव्हाण यांनाच शत्रू मानत त्यांना टार्गेट केले होते.
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादीची ही रणनीती किती यशस्वी ठरली? हे स्पष्ट होणार आहे. परंतु अशोक चव्हाण यांना टार्गेट केलेल्या शिवसेनेसोबतच महानगरपालिकेच्या युतीसाठी आता भाजपला बोलणी करावी लागणार आहे.
काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिकेवर अनेक वर्ष आपले एकहाती वर्चस्व राखले होते. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 81 पैकी तब्बल 73 जागा जिंकत विरोधकांना धूळ चारली होती. त्यामुळे पक्ष बदलला असला तरी नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचाच शब्द प्रमाण मानला गेला पाहिजे,असा आग्रह स्वतः अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांचा आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करण्याचे अधिकार दिलेले असल्यामुळे अशोक चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहाजिकच विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेतील शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी अशोक चव्हाण यांनाच लक्ष केले होते.
शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हातचे न राखता टीका केली होती. आता महापालिका निवडणुकीत राज्यस्तरावर युतीचे धोरण ठरल्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची इच्छा नसतानाही त्यांना शिवसेनेसोबत युतीची बोलणी करावी लागणार आहे.
यासाठी भाजपने पाच जणांची समिती नेमली असून ही समितीच नांदेडमधील युतीचे भवितव्य ठरवणार आहे. तथापि नांदेड वाघाळा महापालिकेत भाजप सर्वाधिक सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरेल आणि सत्ता मिळवेल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेसोबत युतीची तयारी दाखवतानाच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा प्रश्नच नसल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी युतीची बोलणी फक्त शिवसेनेसोबत होईल हे स्पष्ट केले आहे.
1. नांदेडमध्ये कोणाला लक्ष्य करून राजकारण झाले?
➡️ अशोक चव्हाण यांना लक्ष्य करून राजकीय रणनीती आखली गेली.
2. कोणते पक्ष एकत्र आले होते?
➡️ शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील इतर घटक.
3. महानगरपालिका निवडणुकीसाठी पुढील पाऊल काय?
➡️ भाजपशी युतीसाठी चर्चा करावी लागणार आहे.
4. महाविकास आघाडीची भूमिका काय राहिली?
➡️ महाविकास आघाडीपेक्षा चव्हाणविरोधावरच अधिक भर देण्यात आला.
5. याचा नांदेडच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
➡️ आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवी युती आणि संघर्ष पाहायला मिळू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.