
जालना : महायुतीच्या सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खाते वाटप झाले आहे. आता पालकमंत्रीपदासाठी सत्ताधारी (Shivsena) शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या तीनही पक्षात स्पर्धा सुरू झाली आहे. स्थानिकच पालकमंत्री द्या, असा आग्रह सगळ्याच पक्षांचा आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले आहे. यापैकीच एक म्हणजे मराठवाड्यातील जालना जिल्हा.
महायुतीचे सगळे आमदार निवडून आले असले तरी जालन्याला यावेळीही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. सहाजिकच जिल्ह्याला मंत्रीपद नसल्याने पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्याचा असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जालन्याचे पालकमंत्रीपद (Atul Save) भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्याकडे होते.
आता पुन्हा त्यांच्याकडेच जालन्याचे पालकत्व जाण्याची शक्यता लक्षात घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अतुल सावे यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. सावे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात शिवसेनेला सापत्न वागणूक देण्यात आली, जिल्हा नियोजन समितीत निधी दिला नाही, असा आरोप स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनीही आमच्या जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री द्या, अशी मागणी केली.
त्यामुळे येत्या काळात जालना जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री अतुल सावे यांनी मागील अडीच वर्षात जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना सापत्न वागणूक दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना भरीव निधी दिला नाही, विश्वासात घेतले नाही, तसेच आमच्यावर गुन्हे दाखल केले, असा आरोप शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये, म्हणत विरोध दर्शवला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, संपर्कप्रमुख पंडित भुतेकर,शहरप्रमुख विष्णू पाचफुले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबासाहेब इंगळे यांनी सोमवारी ( ता.23) माध्यमांशी संवाद साधत अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यास विरोध केला. सावे यांनी मागील अडीच वर्षात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना कमी प्रमाणात निधी देऊन दुय्यम वागणूक दिली. कोणत्याही कामात महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला विश्वासात घेतले नाही. याबद्दल एका बैठकीत विचारणा केली असता, त्यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.
मंत्री सावे युतीसाठी घातक आहेत,आम्हाला जालन्याचे पालकमंत्री म्हणून मराठवाड्यातला कोणताही मंत्री चालेल, पण अतुल सावे नको अशी ठाम भूमिकाशिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामुळे भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आले. तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे बनले होते, असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, जालन्याचे पालकमंत्री पद शिवसेनेला दिले पाहिजे. पण मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारू. पालकमंत्रिपदाबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधाबद्दल मला काहीही कल्पना नसल्याचे अर्जून खोतकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.