बीड : सरपंचाचे अपहरण करुन खुनाची घटना घडल्यानंतर दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना जिल्ह्यात समोर आली. अपहरण, वाळू माफिया, गोळीबार, खुन अशा घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय ठरत आहे. सोमवारी (ता. 9) मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले.
केज पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्यासाठी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान, गुन्हा नोंद होईपर्यंत संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. (Beed News)लोखंडी सळ्या, रॉडने मारहाण केल्याने त्यांचा खुन झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, सर्व आरोपींना अटक करुन आरोपींना पाठबळ देणाऱ्याचे नाव समोर आणावे अशी मागणी जिल्हाभरातून केली जात आहे.
मंगळवारी (ता.10) या मागणीसाठी जिल्हाभरातील ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या. तसेच, सोमवारी रात्री अहमदनगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर मस्साजोग येथे रात्री सात ते पहाटे तीन वाजेपर्यंत ग्रामस्थांनी ठिय्या मांडून वाहतूक अडविली. (Crime) दुसऱ्या दिवशी मंगळवारीही सकाळ पासून याच ठिकाणी रास्ता रोको सुरु आहे. आरोपींचा शोध लागेपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणार नाही आणि अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
याच मागणीसाठी केज शहरातही बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी एक बंद बस पेटविल्याची आणि केजच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयावर दगडफेक केल्याची घटनाही घडली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही देशमुख कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, आंदोलनात काही काळ सहभाग घेतला.
आरोपींना अटकेची मागणी कॉंग्रेस खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आदींनी केली. बीडचा बिहार होत असल्याचा आरोपही सोनवणे व क्षीरसागर यांनी केला. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच बंदुकीचा धाक दाखवून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी परळी शहरातून व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली.
अमोल विकास दुबे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता अपहरण केलेल्या दुबे यांना दोन कोटीची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून सोन्याचे लॉकेट, 10 तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट व नगदी तीन लाख 87 हजार रुपये रक्कम घेऊन खंडणीखोरांनी त्यांना उशिरा सोडून दिले. मंगळवारी याबाबत गुन्हा नोंद झाला. जिल्ह्यात गुंडगिरी, वाळू माफिया, गुटखा माफियांचा उच्छाद वाढला आहे.
गंभीर गुन्हे असणाऱ्यांकडे शस्त्र परवानेही समोर आले आहेत. मागच्या आठवड्यात खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा पकडून पोलिस मुख्यालयात लावण्यात आला. मात्र, माफियाने हा हायवा पळवून नेऊनही गुन्हा नोंद नाही. माफिया यंत्रणेवर शिरजोर झाले असून सत्तेतील काही लोकांचे यांना पाठबळ असल्याचे समोर आले आहे. सरपंच खुन प्रकरणातही असाच आरोप केला जात आहे. एकूणच गोळीबार, खुन, अपहरणाच्या घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय झाल्याने आता वरिष्ठ पातळीवरुनच कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.