Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली शहराच्या पाणी योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावे, यासाठी सत्ताधारी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या मुंबईला जाण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींसह भाजप नगरसेवकांनी श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले आणि दुसरीकडे शासनाच्या निर्णयाचे स्वागतही केले.
महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची शासनाने गुरुवारी बदली केली. त्यांच्या जागा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घेणार आहेत. जी. श्रीकांत यांच्या बदलीमुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. अनेक वर्षांपासून शहरवासीय पाणी टंचाईने त्रस्त असल्याने श्रीकांत यांनी पाणी योजनेसाठी पुढाकार घेत कामाला गती दिली होती.
14 एप्रिलला पाणी योजनेचे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येणार आहे. त्यानंतर हे पाणी शहरात वितरित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. पाणी योजनेच्या बारकावे माहीत असलेल्या जी. श्रीकांत यांची बदली होऊ नये, अशी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची इच्छा होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची भेट घेऊन विनंती करण्याची तयारी अनेकांनी केली.
पण त्यात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. दरम्यान शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे (BJP) नगरसेवक राज वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, ॲड. माधुरी अदवंत यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक केले. पाणी, अतिक्रमण हटाव, कचऱ्यासह इतर विषयात जी. श्रीकांत यांनी चांगले काम केले, पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात होते, ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी थांबावे, अशी प्रत्येकाची भावना आहे.
पण शेवटी शासन निर्णय आहे, तो मान्य करावा लागतो. जी. श्रीकांत यांना पुढील कामासाठी शुभेच्छा, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. जी. श्रीकांत यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकताच सगळ्यांना धक्का बसला होता. पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी अनेक जाहीर कार्यक्रमातून शहराची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आयुक्तांना जाऊ देणार नाही, असे सांगितले होते.
त्यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी आम्ही जी. श्रीकांत यांना किमान शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत तरी बदली देऊ नका, या निर्णयाला स्थगिती द्या, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे म्हटले होते. तसेच महापौर, नगरसेवक व काही पदाधिकारी सीएम फडणवीस यांची भेटही घेणार होते. परंतु बदल्यांमध्ये हस्तक्षेप नको, असा स्पष्ट संदेश फडणवीस यांनी दिल्यामुळे सगळ्यांनी शासन निर्णय शिरसावंद्य मानत तो स्वीकारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.