Kailas Gorantyal-Arjun Khotkar News : जालन्यात युतीचा पाळणा हलेना, गोरंट्याल-खोतकर यांच्या हातीच दोरी..
BJP-Shivsena Alliance News : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत युती करा, असे आदेश राज्य पातळीवरील महायुतीतील तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिले आहेत. परंतु कोणत्याच पक्षाला मनापासून युती करण्याची इच्छा नाही. त्यामुळे जागा वाटपात ताणून धरायचे आणि स्वबळासाठी दंड थोपटायचे अशीच मानसिकता महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची झाली आहे.
जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी या शहरात प्रामुख्याने हे चित्र पहायला मिळते. जालना महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेचे उपनेते आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन महिन्यापुर्वी भाजपचे महानगर प्रमुख भास्कर दानवे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये आल्याने युतीच्या प्रस्तावाकडे त्यांच्या सांगण्यावरूनच कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. स्वबळावर निवडणूका लढवून भाजपचा महापौर बसवतो, असा दावा गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाच्यावेळीच राज्यातील प्रमुख नेत्यांसमोर केला होता.
जिल्ह्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांना रोखण्याची संधी या निमित्ताने गोरंट्याल यांना चालून आली होती. परंतु राज्याती बदलत्या राजकीय परिस्थितीने पुन्हा एकदा महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाला. त्यामुळे कैलास गोरंट्याल कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. परंतु वरिष्ठाचे आदेश आल्याने इच्छा नसताना त्यांनी युतीसाठीच्या पहिल्या फेरीच्या चर्चेत सहभाग नोंदवला. पण या बैठकीत शिवसेनेने युतीचा निर्णय होण्याआधाची महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणे योग्य नाही, अशी उघड नाराजीही व्यक्त केली.
पहिल्या फेरीची चर्चा सकारात्मक झाली असली तरी कोणत्या आणि किता जागा कोण लढवणार? यावर एकमत होते का? यावर युती अवलंबून असेल, असेही गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेनेला युतीसाठी ताटकळत ठेवल्यामुळे अर्जुन खोतकर यांनीही ताठर भूमिका घेतली. भाजपला हौस असेल तर ती आम्ही फिटवू, कुठल्याही परिस्थिती महापौर शिवसेनेचाच होईल, असे सांगत अर्जुन खोतकर यांनी दोन महिन्याआधीच विष्णू पाचफुले यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती.
नेमकं भाजपला हेच खटकलं, महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नसताना शिवसेनेने विष्णू पाचफुले यांचे नाव जाहीर केल्याने कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे ही कमालीचे नाराज झाले. आता हे सगळं विसरून नव्याने युतीची बोलणी करणे दोन्ही बाजूने जड जात आहे. गोरंट्याल-खोतकर यांचा अंहकार जालन्यात युतीच्या आड येऊ शकतो? अशी चर्चा आता होत आहे.
नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे महापौर पदासह सत्तेवर महायुतीतील भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांचा डोळा आहे. शिवसेनेचा आग्रह पहिले अडीच वर्ष महापौर पद शिवसेनेला मिळावे असा आहे, तर भाजपला हे मान्य नाही. त्यामुळे आता युतीच्या बोलणीत काही मार्ग निघतो का आणि जालन्यात युतीचा पाळणा हलतो का? हे येत्या तीन-चार दिवसात स्पष्ट होणार आहे.
जालना नगरपरिषदेवर कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेत कैलास गोरंट्याल यांनी घरातलाच नगराध्यक्ष करत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या होत्या. शिवसेना-भाजप हे कायम विरोधी पक्षात राहिले. आता केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे महापालिकेत शतप्रतिशत कमळ फुलवण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे हे कैलास गोरंट्याल यांच्या मदतीने करत आहेत. तर अर्जुन खोतकर विधानसभेला निवडून येत पुन्हा आमदार झाल्याने त्यांनाही महापालिकेत पहिला महापौर हा शिवसेनेचाच करायचा आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्षा विजय झाल्या होत्या. 61 पैकी 29 काँग्रेसचे सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने (Congress) सत्ता मिळवली होती. तर शिवसेना- भाजपला प्रत्येकी 11 जागा मिळाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
