Aurangabad Lok Sabha Constituency winners News : महायुतीत भाजपशी संघर्ष करून लोकसभेच्या संभाजीनगरची जागा मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा उमेदवार देण्याची खेळी कमालीची यशस्वी ठरली. महायुतीचे संदीपान भुमरेमामा लाखभराच्या मताधिक्याने लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुमरेंच्या बाबतीत संभाजीनगरात नरमाईची भूमिका घेतल्याने मराठा उमेदवाराला 'पाडा' ची मात्रा इथे लागू पडली नाही. उलट भुमरे यांना याची मदतच झाल्याचे दिसून आले. सुरुवातीपासून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी आणि काँटे की टक्कर संभाजीनगरात होईल, असे बोलले जात होते. मात्र निवडणुकीच्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे भुमरे यांची फाईट एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी झाली. वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी 58 हजार मते मिळाल्याने एमआयएमचा पतंग कटला. हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 30 हजार मते घेतली, त्यांना मतदारांनी पुर्णपणे नाकारल्याचे दिसून आले.
संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतील भाजप-शिवसेना यांच्यात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना दगाफटका होऊ नये, मराठा मतांचे विभाजन टळावे यासाठी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची समजूत काढत त्यांना माघार घ्यायला भाग पाडले होते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा मतदान भुमरे यांच्या पारड्यात पडले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच मराठा मतदारांनी एकगठ्ठा मते अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना दिली होती. पण तेव्हा जाधव निवडून न आल्याने इम्तियाज जलील खासदार झाले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याने यावेळी हे मत विभाजन टाळत भुमरेंच्या पारड्यात एकगठ्ठा मतं टाकण्यात आली.
भाजप, शिवसेना शिंदे गटावर नाराज असलेल्या ओबीसी आणि काही प्रमाणात मराठा मतदारांनी चंद्रकांत खैरे यांचा पर्याय स्वीकारला खरा, पण खैरे या शर्यतीत खूप मागे पडले. मुस्लिम वोट बॅंकेच्या जोरावर इम्तियाज जलील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली, पण विजयासाठी ती पुरेशी ठरली नाही. भुमरे यांना उशीरा उमेदवारी जाहीर झाली, पण योग्य नियोजन, भाजपची मजबुत प्रचार यंत्रणा या जोरावर भुमरे यांनीच निवडणुकीच्या निकालात बाजी मारली.
गेल्या निवडणुकीत संभाजीनगरात शिवसेनेचा पराभव झाला होता. भुमरे यांच्या रुपाने हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असल्याचा फायदा भुमरे यांना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात झाला. भुमरेंच्या विरोधात महाविकास आघाडीने दारुवाला पाहिजे की पाणी देणारा? गद्दार हवा की एकनिष्ठ? असा प्रचार केला. मात्र याला मतदारांनी फारसे महत्व न देता भुमरेंना विजयी केले. भुमरेंनी तब्बल 37टक्के मतदान घेतले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी इम्तियाज जलील यांना 28 टक्के मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना 23 टक्के मतांवर समाधान मानावे लागले.
(Edited by : Chaitanya Machale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.