AIMIM : मालेगाव बाॅम्बस्फोटानंतर देशातील भगवा दहशतवाद समोर आला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले असेल, तर मग बाॅम्बस्फोट कोणी केले? हा प्रश्न कायम राहतो. शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी हा तपास केला होता. त्यामुळे आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली.
मालेगाव बाॅम्ब स्फोट (Malegaon Blast) प्रकरणातील सर्व आरोपींची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे . केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवलं जाऊ शकत नाही असे सांगत या घटनेतील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे. 29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात 6 जण मरण पावले होते, तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.
या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्षांनी या निकालाचे स्वागत करत न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. तर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मात्र या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालिन पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. मालेगाव बाॅम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद समोर आला होता. दहशत निर्माण करण्यासाठी हे केले गेले होते.
आता यातील सगळे आरोपी निर्दोष असतील, तर यामागे कोण होते? स्फोट कोणी घडवले? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तुरुगांत डांबण्याची हिमंत कोणी केली? पुरोहित नावाचे लष्करी अधिकारी देखील या प्रकरणात आरोपी होते, मग त्यांनाही अडकवण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यातून न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, असे इम्तियाज जलील म्हणाले.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या मालेगाव स्फोटातील आरोपी अशीच ओळख त्यांची निर्माण झाली होती. भाजपने तर त्यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देत क्लीन चीटच दिली होती, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या घटनेवेळी आर.आर. पाटील गृहमंत्री असताना आरोपींवर दहशतवादी कारवाया अंतर्गत केसेस झाल्या. विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मग त्याकाळात आरोपींवर झालेली कारवाई ही कुठल्याही पुराव्याशिवाय करण्यात आली होती का? ते पुरावे खोटे होते का? जर खोटे होते तर ते कोणी तयार केले? असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
काय आहे प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरहून अधिक लोक जखमीही झाले होते. मशिदीत प्रार्थना सुरू असताना हा स्फोट झाला होता. 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या आझाद नगर पोलिस ठाण्यात अनेक कलमांखाली या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, रामजी कालसंग्रा, शामजी साहू, संदीप डांगे, प्रविण तकलकी आणि राकेश धावडे अशा बारा जणांवर आरोप होते. यातील काहीजण फरार आहेत. वर्षानंतर या खटल्यातील वरील ओरीपींना निर्दोष ठरवणात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.