Latur News : विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली. यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिले पण ते हास्यस्पद होते. दुसरीकडे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसेच टेबलवर पत्ते फेकले या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील यांच्यासह छावाच्या इतर कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय जाळण्याचा, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. दरम्यान वाढता रोष लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना तातडीने राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर (Latur) लातूर पोलिसांनी सुरज चव्हाण यांना अटक केली. मात्र काही वेळातच त्यांना जामीनही मिळाला. यावर सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी राजकीय दबाव होता का? असा सवाल लातूर पोलिसांना विरोधाकांकडून केला जात आहे.
दरम्यान लातूर येथे उपचार घेत असलेल्या विजय घाडगे पाटील यांच्या भेटीसाठी आज मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) आले होते. सुरज चव्हाण हा या प्रकरणातला छोटा मोहरा आहे अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, असे महाजन म्हणाले. सुरज चव्हाण याला अटक करून ताबडतोब जामिनावर सोडण्यात आले यावर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्र थांबणार नाही, हे सांगितलेलेच आहे, हा त्यातलाच प्रकार असल्याची उपरोधिक टीका महाजन यांनी केली.
खोके मिळाले नाही, म्हणून रमी खेळले..
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचेही काही चुकले असेल असे मला वाटत नाही. ज्यांना खोके मिळाले ते हॉटेल खरेदी करत सुटले, जमिनी खरेदी करू लागले आहेत. तर गृहराज्यमंत्र्यांचा डान्सबार आहे. माणिकराव कोकाटे यांना खोके मिळाले नाही म्हणून ते सभागृहात रमी खेळून पत्त्याचा डाव लावत होते. त्यातून काही मिळते का? असा त्यांचा कदाचित प्रयत्न असावा, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी लगावला. राज्याच्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि त्या तीन पक्षाचे मालक वेगवेगळे आहेत.
महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती, परप्रांतीयांकडून मराठी लोकांना मारहाण यासारखे प्रकार सुरू असताना राज्याचे राज्यपाल भाषेचा वाद करत बसलो तर उद्योग, परकीय गुंतवणूक कशी येईल? असे म्हणतात. ते महत्त्वाच्या पदावर बसले आहेत त्यामुळे त्यावर काय बोलावे? आमच्या मराठी भगिनीला मारहाण केली जाते, तिच्यावर लाथाबुक्क्यांनी प्रहार केला जातो हे या महाराष्ट्रात कदापि सहन केले जाणार नाही. तो जो कोणी झा आहे तो जर माझ्या हाती लागला असता तर ज्या पायाने त्याने आमच्या मराठी भगिनीला मारलं तो पायच जागेवर ठेवला नसता, असा इशाराही प्रकाश महाजन यांनी दिला.
लातूरमध्ये जेव्हा आमच्या काळात मी कुपोषण केले होते तेव्हा विजय घाडगे पाटील हा तरूण मला पाठिंबा द्यायला आला होता. त्यामुळे लातूरमध्ये येताच मी त्याची भेट घेण्यासाठी आलो, असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले. या राज्यात शेतकऱ्यांनी न्याय मागायचा नाही, त्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायचे नाही, जो बोलतो त्याला त्रास दिला जातो. बच्चू कडूंचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे.
या तरुणाने काय केले होते? शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या, ढेकळाचा पंचनामा करायचा का? असे बेताल विधान करणाऱ्या आणि सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा मागितला यात त्याचे काय चुकले? असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला. म्हणूनच मी म्हणतो महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि सध्या तेच सुरू आहे, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.