
Dharashiv News : राज्यात एकीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन वाद पेटला असतानाच दुसरीकडे धाराशिवमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून दोन्ही पक्षांत धमासान सुरू आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विविध विकास कामांना स्थगिती मिळाल्यानंतर जिल्ह्याचा पालक-चालक यावरुन वाद पेटला आहे. आता याच विषयाला धरुन भाजपच्या मेळाव्यात बोलताना मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) शिवसेना नेत्यांना रोखठोक इशाराच दिला आहे.
भाजप नेते नितेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्याचा संदर्भ देत पुन्हा एकदा मोठं विधान करत डिवचलं आहे. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा.सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीवजा इशाराच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप नेते नितेश राणे शनिवारी (ता.7) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, त्यांच्याकडून धाराशिव (Dharashiv Shivsena) जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं म्हटलं आहे.
भाजप मंत्री नितेश राणेंकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचा धडाकाच लावला आहे. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोपही वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. अशातच त्यांनी आता धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेत्यांना दम भरला आहे.
नितेश राणेंनी यावेळी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरूनही खोचक टोला लगावला. ते म्हणाले, ते दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चेने आम्हाला झोप लागत नाही.एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे.या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत,आम्हाला घाम फुटल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या स्थगिती दिली असून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या जिल्हा नियोजन समितीच्या काम वाटपावर आक्षेप घेत मुख्यमंत्री फडणवीसांकडे पालकमंत्र्याबाबत तक्रार केल्याची चर्चा आहे.त्यानुसारच मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री यांच्याकडून 26 मार्चला एक निवेदन घेतले व त्यावर स्थागिती दिली.
धाराशिव जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 15 टक्के प्रमाणे 30 टक्के कामे सत्ताधारी आमदारांना,2 विरोधी पक्षाचे आमदार व खासदार यांना प्रत्येकी 10 टक्के असे 30 टक्के व शिल्लक 40 टक्के निधी हा पालकमंत्री यांना असे निधीवाटप सूत्र ठरल्याची माहिती आहे.
पालकमंत्री यांनी त्यांच्या कोट्यातील काही कामे मर्जीनुसार द्यावी यावरून वाद सुरु आहे. पालकमंत्री परजिल्ह्यातील बाहेरील आहेत,त्यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे त्यांनी सांगेल तिथे निधी द्यावा यासाठी काही जणांकडून जोर लावला जात असल्याचं बोललं जात आहे.यावरुन भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.