
Beed, 10 February : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये बऱ्याच दिवसानंतर मनमोकळेपणाने भाषण केले. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनेकांना त्यांनी चिमटे काढले, तर काहींना थेट इशारा दिला आहे. आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावे लागेल, असे सांगून आमदार सुरेश धस यांना ‘वार्निंग’ दिली, तर अडचणीत आल्यावर गडावर जाणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेंनाही त्यांनी सुनावले, त्याचबरोबर भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनाही पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले. धर्मात काम करणाऱ्यांनी राजकारणापासून वैराग्य धारण केले पाहिजे, असा टोला पंकजा मुंडे यांनी नामदेवशास्त्रींना लगावला.
बीड जिल्ह्यातील कोणत्याही गडावर लोकं का जातात, हे मला माहिती नाही. गडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे जात असतील. आपण त्या गडावर गेलो, गडावरील एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि गडावर येणारे सर्व भाविक आपले होतात, असं कोणाला वाटत असेल, असा टोला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला.
संतोष देशमुख खूनप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडमुळे आरोपांनी घेरलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामेदवशास्त्री यांची भेट घेतली होती, तर नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेच्या पाठीशी गड उभा राहील, असे विधान केले होते. त्यावर राज्यात जोरदार वादंग उठले होते. त्यावरून पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला लगावला होता.
त्या म्हणाल्या, माझं उलटं आहे हो. मला गडावरील पब्लिक आपलं आहे, असे वाटतंय म्हणून गडावर जावं वाटतंय. गडावरील पब्लिक आपली करायची म्हणून जावंसं वाटत नाही. गडावर येणारा प्रत्येक माणूस आपला असतो. मी कधीच आयत्या कार्यक्रमाला जात नाही. मी खूप कार्यक्रम करते. ताई इकडं या, ताई तिकडं या. एवढ्या दिवसाचा सप्ताह आहे. अरे सप्ताहात माझं काय काम आहे. सप्ताहाला आईसाहेबांना न्या. सभेला मला बोलवा. सप्ताहाला मला बोलावलं तर गडबड होते.
धर्मकारण आणि राजकारणात एकमेकांचं नातं तर असलंच पाहिजे. पण, तेवढीच विरक्तसुद्धा असली पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्मच्या सत्तेवर विराजमान होऊ शकत नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी नाव न घेता महंत नामदेवशास्त्रींना लगावला.
शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की, दरवेळी धर्मसत्ता आणि राजसत्ता ही हातात हात घालून चालत असते. महाकुंभसाठी दररोज लाखो, करोडो लोक जगभरातून येत आहेत. पहिलं धर्माचं काम करणारी लोक जात होती. त्यांच्या दर्शनासाठी आजूबाजूचे, पंचक्रोशीतील लोक जायचे. आता बीड जिल्ह्यातील पाच पन्नास हजार लोक कुंभमध्ये जाऊन गंगेत डुबकी मारून आले आहेत. म्हणजे पुढची पापं करायला मोकळे का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.