

NCP news : शिक्षकांच्या मुख्यालय न राहण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि पदवीधर शिक्षक आमदार तसेच राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये सध्या संघर्षाचा भडका उडाला आहे. मुख्यालय न राहणाऱ्या 1086 शिक्षकांवर एक वर्षाची वेतन वाढ तीन वर्षांपर्यंत रोखण्याची कारवाई छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. यावरून राजकारण तापलेले असतानाच आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा पदवीधर आणि शिक्षक आमदारांची आपल्याला गरजच नाही असे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. यावर संतापलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी सुनावले आहे. 'उद्या विधान परिषदच नको' असे म्हणाल का? अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
गंगापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांनी 'शिक्षकांनो तुम्हाला मी सस्पेंड करेल, तुमच्या जागी दुसरे शिक्षक लावीन, शिक्षक आणि पदवीधर आमदारांची आता आम्हाला गरज नाही" या केलेल्या विधानाचा व्हिडीओ पाहिला. खरे तर शिक्षकांना अशा धमक्या देण्याआधी आमदार महोदयांनी लोकशाहीचा अर्थ समजून घेतला असता तर अधिक बरं झालं असतं..! शिक्षक हा कुणाच्या दयेवर नोकरी करणारा कर्मचारी नाही, तो हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा राष्ट्रनिर्माता आहे.
प्रशासनातील त्रुटी असतील तर त्या नियमांच्या चौकटीत सोडवाव्यात, धमक्या देऊन शिक्षकांना दहशतीखाली ठेवणे हा लोकशाही मार्ग नाही. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याआधी आमदार बंब साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातील शाळांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर अधिक बरे होईल, असे सतीश चव्हाण म्हणाले.
आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची काय अवस्था आहे हे पहा... शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, पावसाळ्यात याच विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावं लागते. बंब साहेबांनी एक दिवस ‘एसी’ गाडीतून उतरून एखाद्या विद्यार्थ्यासोबत चिखलातून चालत शाळेपर्यंत जाऊन दाखवण्याची तसदी घेतली तर निश्चितच त्यांना विद्यार्थ्यांच्या वेदना कळल्या असत्या, असा टोला सतीश चव्हाण यांनी लगावला.
‘शिक्षक आणि पदवीधर आमदारांची आता गरज नाही’ असं देखील आमदार महोदय म्हणाले. विधान परिषद ही कुणाच्या वैयक्तिक इच्छेवर चालणारी व्यवस्था नाही. विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र प्रक्रिया निश्चित केली आहे. बंब साहेब, आज शिक्षक आणि पदवीधर आमदार नको म्हणत असाल, तर उद्या ‘विधान परिषदच नको’ असेही म्हणाल का? असा सवाल आमदार चव्हाण यांनी विचारला आहे.
शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना सभागृहात आवाज मिळावा, त्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास याव्यात आणि धोरणनिर्मितीत त्यांचा सहभाग असावा, यासाठी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची स्वतंत्र रचना आहे. आमदार महोदय, ‘आमदारकी ही जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे, अधिकार गाजवण्याचा परवाना नाही’. यापुढे आपण लोकशाहीतील संस्थांना कमी लेखण्याऐवजी घटनात्मक व्यवस्थेचा आदर कराल हीच अपेक्षा, असा चिमटा ही सतीश चव्हाण यांनी भाजपचे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांना काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.