

नागपूर हिवाळी अधिवेशनात परभणीच्या विकासावरून आमदार राहुल पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून परभणीकरांना सोयी-सुविधा नाकारल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विकासकामे रोखणाऱ्या व फाईली दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर CBI चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
Parbhnai News : परभणी शहरासाठीची समांतर पाणीपुरवठा, भूमिगत गटार, रस्ते, कचरा प्रक्रिया या सारख्या विकास कामांमध्ये खोडा का घातला असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी, पाच पाच वर्ष विकास कामांचे प्रस्ताव, फाईली दाबून ठेवणाऱ्या प्रशासनातील झारीचे शुक्राचार्य कोण आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तर विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणूनच तुम्ही परभणीकरांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार नाही का? परभणीकरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
नागपूरातील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप नुकतेच वाजले. परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रश्न आणि पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डाॅ. राहुल पाटील चांगेलच आक्रमक झाले होते. परभणीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेला 2022 मध्ये मंजुरी मिळाली.
परंतु चार वर्षात ती पुढे न सरकल्याने योजनेची किमंत आता वाढली आहे. जुन्या दरात कंत्राटदार काम करायला तयार नाही. सरकारने नव्या दराने योजनेला सुधारित मान्यता दिली तर योजनेचे काम मार्गी लागून पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, याकडे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
158 कोटींचीही पाणीपुरवठा योजना आणि 408 कोटींची भुमिगत गटार योजना 2021 मध्ये मंजूर झाली होती. परंतु पाच वर्षानंतरही या योजनेच्या कामला गती मिळाली नाही. त्यावेळी मंजुर झालेले दर आणि आताचे दर यात बरीच तफावत आहे. कंत्राटदार जुन्या दरात काम करण्यात तयार नाही. पाच पाच वर्ष योजना रखडवणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही राहुल पाटील यांनी केली.
या शिवाय भुमिगत गटार योजनेसाठी कृषी विद्यापीठाची जागा, कचरा डेपोसाठी विस्तारित जागा या मागण्याही प्रलंबित आहेत. नाट्यगृह, शहरातील रस्त्यांसाठी महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी 29 कोटी अद्याप नव्या सरकारने वितरित केलेला नाही, याकडेही राहुल पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
केवळ विरोधी पक्षाचा आमदार आहे, म्हणून परभणीकरांवर अन्याय करू नका. आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप करताना विकासकामाती अडथळे तातडीने दूर करा, अशी मागणीही राहुल पाटील यांनी केली. पाच वर्ष ज्यांनी विकास कामे आणि योजना रोखल्या त्या दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, या मागणीचा पुनरुच्चारही राहुल पाटील यांनी केला.
1. राहुल पाटील नेमके का संतापले आहेत?
➡️ परभणी जिल्ह्याच्या विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोपामुळे ते संतापले आहेत.
2. त्यांनी सरकारला कोणते प्रश्न विचारले?
➡️ विरोधी आमदार आहे म्हणून परभणीकरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जातो का, असा सवाल त्यांनी केला.
3. कोणावर चौकशीची मागणी करण्यात आली आहे?
➡️ पाच-पाच वर्षे विकास प्रस्ताव फाईलमध्ये अडकवणाऱ्या अधिकाऱ्यांवर CBI चौकशीची मागणी आहे.
4. ही भूमिका कुठे मांडण्यात आली?
➡️ नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ही भूमिका मांडण्यात आली.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
➡️ प्रशासनावर दबाव वाढून विकास कामांचा वेग वाढण्याची किंवा राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.