.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
परभणी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची (Parbhani) परभणीच्या न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू या दोन्हीही घटना धक्कादायक आणि क्लेशदायक आहेत. बीड प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे. या दोन्हीही घटनांकडे आम्ही माणुसकीच्या नजरेतून पाहतो, यात आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतु ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे ती पाहता या सरकारला झोप कशी लागते? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, क्लीन चीट मिळाली की त्यांनी पुन्हा यावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील सर्वसामान्य लोकांची हीच भावना असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी तसेच आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आज परभणीत आल्या होत्या.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेतील पिडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या भावनेतूनच आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही याकडे पाहतो. परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून ती हत्या असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला, तसेच, बीड व परभणी जिल्ह्यातील या दोन्ही घटनांमध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत एकसंघ राहून लढा देण्याचे आवाहन केले.
बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या दोन्ही घटना अमानवीय असून त्या हत्याच आहेत. पोलिसांना बोलण्याचा अधिकार आहे, मात्र मारण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत सुळे यांनी पोलिसांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला. आम्हाला यात राजकारण आणायचे नाही परंतु बीडच्या प्रकरणात सर्व आरोपींना मोक्का लावला, मग वाल्मीक कराड यांच्यावर तो का लावण्यात आला नाही? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. वाल्मीक कराड यांच्याकडे असे काय गुपित आहे? की ज्यामुळे त्याला सरकारकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तो पोलिसांना शरण आला ही लाजिरवाणी गोष्ट असून केवळ गृह खात्याचे नाही तर या सरकारचे हे अपयश असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या दोन्ही घटनांमध्ये पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. आता पुन्हा दिल्लीत गेल्यानंतर याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.