Jalna News, 25 Dec : आगामी मुंबई महापालिकेच्या निमित्ताने बुधवारी (ता.24) उद्धव आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षांची युती केल्याचं जाहीर केलं. युतीची घोषणा केल्यानंतर ठाकरे बंधूंनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आताची निवडणूक ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, त्यांचा पक्ष संपुष्टात येईल, असं वक्तव्य केल्याचं पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, रावसाहेब दानवे यांना आता त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, त्याच्यावर काय बोलायचं अशी बोचरी टीका केली.
तर उद्धव ठाकरे बोलत असतानाच राज ठाकरेंनी त्यांच्या हातातील माईक घेतला आणि म्हणाले, 'मला असं वाटतं उत्तरं देवाला द्यावीत, दानवांना नाही', असा मिश्किल टोला लगावला. राज यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, आता ठाकरेंच्या याच टीकेला भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, दोन्ही बंधु एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असं वागावं. 2019 आणि 2024 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली.
ते भाजपाला सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांचं अडीच वर्षांचं सरकार या राज्यातल्या लोकांना आवडलं नाही. सत्तांतर झालं. त्यांचा एक-एक शिलेदार त्यांना सोडून गेला. तर काल एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती, दुसरीकडे कार्यकर्ते त्यांना सोडून जात होते. पण मी बोल्लेलं त्यांच्या जिव्हारी लागलं.
ते काय म्हणाले की दानवेंचं तरी पक्षात काय आहे, पण मला माझ्या पक्षाने सभापती केलं, आमदार, खासदार केलं त्याशिवाय दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केलं. मला जर कोणी पक्षात विचारत नसतं तर असं केलं असतं का? आता माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार आहे,' असं सांगत पक्षाने आपल्याला काय काय दिलं याची यादीच दानवेंनी दिली.
शिवाय याचवेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली, ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा फाडून, शेपुट खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. डरकाळ्या मारत मी विधानसभेत आणि लोकसभेत गेलो. मी म्हणालो हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत, कारण प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होतं. त्यामुळे आता ते हरले तर कार्यकर्त्यांना काही अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे सगळे सोडून जातील.'
दरम्यान राज ठाकरेंनी 'देवाला द्यावीत, दानवांना नाही' असा टोला लगवला होता त्या संदर्भात पत्रकाराने विचारलं असता दानवे म्हणाले, 'दोन्ही भावांवर एकदाच टीका करू नये, राज साहेबांना राहुंद्या मागं, यांचं होऊन जाऊद्या एकदा उद्या काय बोलतात ते पाहू,' असं म्हणत त्यांनी राज यांच्यावर बोलणं टाळलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.