

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीची जोरात तयारी सर्वच पक्षाकडून सुरु आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे सध्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लगभग पाहवयास मिळत आहे. विशेषतः मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजप व ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र, कुठल्याही परिस्थितीत भाजपने वर्चस्व मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याचाच एका भाग म्हणून आता भाजपने 144 जणांच्या टीमवर या महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबईत नऊ वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या (Shivsena) खालोखाल जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसाठी मोठी संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे भाजप मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून भाजपने प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यातच आता लवकरच महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याने निवडणुकीसाठी भाजपने 144 जणांची टीम नेमली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने (BJP) 144 सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली. पक्षाची रणनीती, संघटन आणि प्रचाराची धुरा या समितीवर सोपविण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे. या समितीमध्ये प्रामुख्याने मुंबईतील भाजप आमदार, सहा विभागांतील पदाधिकारी, माजी आमदार, खासदार, नगरसेवक, युवा नेते, महिला आघाडी तसेच विविध आघाड्यांचा प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
2017 साली मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला 82 जागा जिंकता आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाल्यानंतर आमदार साटम यांच्याकडे आता मुंबईचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. शेलार यांची पकड लक्षात घेता, त्यांच्याकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली असल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांचा विशेष निमंत्रित म्हणून समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, युवा मोर्चाचे तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह 144 जणांचा या समितीत समावेश आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही 144 जणांची टीम काम करणार आहे. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने या 144 जणांच्या टीमवर निवडणूक काळात सर्वच यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.