
Sangli News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यगात्मक गाणं करून वाद निर्माण केला आहे. यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी त्याचा शो झाला तो स्टुडिओ फोडला. यावरून त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून शिवसेनाला सुनावलं होतं. आता याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जतमध्ये आजी माजी आमदारांच्यामध्ये जुंपल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला स्वत: जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
राज्यात सुरू झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वादाचे पडसाद सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातही समोर येत आहेत. येथे मराठी पत्रकार संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, खासदार विशाल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जोरदार चर्चा झाली. फक्त चर्चाच झाली नाही तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात जोरदार जुंपली. जगताप यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली, तर पडळकर यांनी भाजपचा किल्ला लढवला. यांच्यात रंगलेल्या वाक् युद्धाची सांगलीसह राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जगताप यांनी, कुंभमेळ्यातील डुबकीवरून भाजपला छेडले. तसेच डुबकी मारली म्हणजे पाप धुतले असे होत नाही असा टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणारे पुष्कळ लोक आहेत. कोरटकर, सोलापूरकर हे काय वाट्टेल ते बोलतात. त्यांना काय होऊ नये, म्हणून भाजपवाले पोलिस संरक्षण देतात. मात्र बाकीचे कोण बोलले, तर मोडतोड करतात. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी नाही का?
एकीकडे सरकार सांगतं की, आम्ही आंबेडकरांची घटना मानतो, घटनेचे पालन करतो. घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मानतो. मात्र तसं होताना दिसत नाही. धर्माच्या नावाखाली धर्मा-धर्मात, जाती-जातीत भांडणे लावली जातायेत. कुंभमेळ्याबाबत टिंगल केली की गुन्हा दाखल होतो. कुंभमेळ्यातील पाण्याबाबत शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आहे. हे पाणी मल-मूत्र विसर्जित आहे. ते पिण्याच्या किंवा अंघोळ करायच्या लायकीचे नाही. धार्मिक सोहळा असतानाही भाजपकडून त्याचा राजकीय इव्हेंट केला जातोय, असा आरोपही जगताप यांनी केला आहे.
तर जगताप यांनी, एकीकडे शासकीय प्रयोगशाळेचा पाण्याबाबत अहवाल देत असताना, यांचे नेतेमंडळी अशा पाण्यात डुबक्या मारत होते. तुम्हाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे? नदीत डुबकी मारली तर पापक्षालन होतं का? म्हणजे भाजपवाले पाप करतात का? सवाल यावेली उपस्थित केला आहे.
यावरून भाजप आमदार पडळकरांनी थेट हल्लाबोल करताना जगतापांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पडळकर म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोक त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या सोयीने वापर करत आहेत. सर्वांसाठी समान न्याय असला पाहिजे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे एक वाक्य बोलले, तर त्यांना थेट अटक केली जाते. एक पत्रकार चॅनलवर बोलला, तर त्याला मुंबईतून उचललं. यामुळे त्याला दिल्लीत जावं लागतं. केतकी चितळेसारखी तरुणी कविता लिहिते, तर तिला महिनाभर तुरुंगात टाकले जाते. यावर का खुलेआम चर्चा होत नाही? तुमच्यासाठी अभिव्यक्ती आणि मग इतरांसाठी ती का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तेरा - चौदा वर्षांत कुणालाही जेलमध्ये टाकलं नाही. या देशात आस्तिक व नास्तिक लोक आहेत. याबाबत घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे. प्रयागराजला 50 कोटी लोकांनी हजेरी लावली. हिंदू एकत्रित येतात व चर्चा करतात, संघटन होतंय. यात काय वाईट असा सवाल करत जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.