
Karad, 11 August : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी डाव-प्रतिडाव टाकण्यास सुरुवात केली आहे. कऱ्हाड उत्तर (जि. सातारा) मतदारसंघातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाला भाजपने खिंडार पाडले आहे. येथील कॉंग्रेसच्या कट्टर समर्थकांनी रविवारी (ता. 10 ऑगस्ट) रात्री मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या या खेळीने कऱ्हाड उत्तरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते काँग्रेसमध्ये राहिले आहेत. त्याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड उत्तर (Karad North) मदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा कॉंग्रेसच्या बालेकिल्ला होता. येथील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तो गड आतापर्यंत राखला होता. मात्र, सक्षम नेतृत्वाभावी विकासकामे करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मर्यादा येऊ लागल्या होत्या. निष्ठावंत काँग्रेस नेत्याची कोंडी हेात होती. हे हेरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे. त्याचा फटका काँग्रेस पक्षाला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बसणार आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा कऱ्हाड उत्तर हा विधानसभा मतदार संघ आहे. सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील गावांचा समावेश कऱ्हाड उत्तर या मतदारसंघात होतो. या मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसचे (Congress) आणि स्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या मतदारसंघावर वर्चस्व राखले आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे मनोज घोरपडे यांच्या रुपाने प्रथमच बिगर काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे. मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीत कॉंग्रेसचे निवास थोरात यांचा विजय झाला होता. बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार असूनही त्यांच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले होते, त्यातून त्या गटावर कॉंग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले होते. मात्र, विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत व्हावे लागले होते.
कऱ्हाड दक्षिणमधून भाजपचे डॉ. अतुल भोसले, तर कऱ्हाड उत्तरमधून भाजपचे मनोज घोरपडे हे आमदार म्हणुन निवडून आले होते. दोन्ही मतदारसंघात काँग्रेस विचारांचा आमदार नसल्याने विकास कामांसाठी भाजपच्या आमदारांकडे जाण्याची वेळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली हेाती. याशिवाय सक्षम नेताही कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेसकडे नाही, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी कोंडी होत होती.
विकास कामांसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, या निर्णयापर्यंत हे काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. काँग्रेस नेत्यांमधील ही अस्वस्थता अखेर कऱ्हाड उत्तरमधील भाजपचे नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी हेरली. त्यांनी कोपर्डे हवेली गटातील कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विकास कामासंदर्भात शब्द देऊन त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये कॉंग्रेसला उतरती कळा लागली असून हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेसकडे शिल्लक राहिले आहेत.
भाजप आमदार मनोज घोरपडेंची दांडी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार मोर्चबांधणी करण्यात येत आहे. इतर पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जात आहे. कोपर्डे हवेली येथील कॉंग्रेसचे कट्टर नेते आणि कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
त्या कार्यक्रमास कऱ्हाड उत्तरचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे गैरहजर होते. त्यांची अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. पण आमदार घोरपडे हे कोरेगाव तालुक्यातील एका नियोजित कार्यक्रमाला गेल्याने ते कऱ्हाड उत्तरमधील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचा नेता भाजपला मिळू न देण्याची बाळासाहेबांची रणनीती
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन उमेदवार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या बाळासाहेब पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून जनसंपर्क वाढविला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत सह्याद्री साखर कारखाना निवडणूक जिंकली. सह्याद्री कारखान्याच्या निकालाने बाळासाहेब पाटील यांचा गट चार्ज झाला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती आखली जात आहे. पक्षातील एकही नेता भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी त्यांच्या गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. बाळासाहेबांनी पक्षाची ताकद कमी होणार नाही, याची दक्षता घेऊन बेरजेचे राजकारण चालवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.