
Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) महाविकास आघाडीत समावेशाबाबतच्या चर्चांनीच काँग्रेसची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मनसेला आघाडीत सामावून घेण्याबाबत काँग्रेसची काय भूमिका असेल यावर अद्याप काँग्रेसनं कोणतंही अधिकृत वक्तव्य टाळलं आहे. तसंच पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी या मुद्द्यावर बोलण्यास देखील काँग्रेसच्या इतर नेत्यांना मज्जाव केला आहे. तर दुसरीकडं, आघाडीतील शरद पवारांच्या पक्षानं तर मनसेच्या समावेशाला जवळपास सकारात्मक असल्याचं चित्र आहे.
राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेनं त्याला सर्वप्रथम विरोध केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना यांनीही हिंदी सक्तीला विरोध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर, गेल्या दोन दशकांपासून दुरावलेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं. सरकारनं हिंदीसक्ती आणि संबंधित अध्यादेश रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संयुक्तपणे ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावली, परंतु काँग्रेसनं अंतर राखणं पसंत केलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळत: प्रादेशिक पक्ष आहेत. तसंच मनसेही प्रादेशिक पक्ष आहे. मात्र, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं स्थानिक राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो. त्यामुळंच बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्याची अपेक्षा आहे. अशावेळी, मुंबईतील बिहारी नागरिकांविरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि कधी कधी त्यांना धमकावणाऱ्या मनसेशी राजकीय आघाडी करणं काँग्रेससाठी जोखमीचं ठरू शकतं. याचा थेट परिणाम बिहारमधील मतांवर होऊ शकतो आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, असं काही वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बिहारच्या निवडणुका दावावर लावणं काँग्रेसला परवडणार नाही.
त्यामुळे काँग्रेसनं या विषयावर मौन बाळगलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्याला डावलून कोणताही निर्णय घेणं आघाडीच्या एकजुटीसाठी अडचणीचं ठरू शकतं. यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्न आघाडीकडून सुरु असून त्यासाठी मनसे-शिवसेना युती आणि शिवसेनेचा महाविकास आघाडीतील सहभाग याबाबत काही राजकीय तडजोड होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. सध्याच्या घडीला राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट आहे आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये पक्षाची पीछेहाट झाली आहे. जर काँग्रेसनं मनसेच्या मुद्द्यावरून आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं स्थानिक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवलं आहे.
या परिस्थितीमुळं सध्या काँग्रेसची अवस्था बोलता येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना युतीबाबत सध्या कोणतंही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत. मनसेपासून ठराविक अंतर राखण्याचं आणि या विषयावर केंद्रीय नेतृत्वच अंतिम निर्णय घेईल, तोपर्यंत हा विषय बंद ठेवण्याचे आदेश नेत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.