

Maharashtra Local Body Elections Update: राज्यातील जिल्हा परिषदांची गट व गणांची अंतिम मतदार यादी काल जाहीर होणार होती. मात्र निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम पुढे ढकलत 12 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर इच्छुकांनी धास्ती घेतली आहे. तब्बल 15 दिवसांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लांबल्याचे चित्र निर्माण झाल्याने इच्छुकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिका ही पुढील काही महिन्यांत होणाऱ्या गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर थेट परिणाम करणार आहे. त्यामुळे इच्छुकांनीच आता सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.
काहीजणांनी तर दोन्ही दगडावर हात ठेवल्याचे चित्र आहे. जोपर्यंत निवडणूक आयोग जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर करत नाही तोपर्यंत इच्छुकांना तोंडावर बोट ठेवावे लागणार आहे.
आगामी जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत घेतलेली भूमिका सहकारातील निवडणुकांमध्ये अडचणीची ठरू शकते. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद मधील इच्छुक उमेदवारांनी लोकप्रतिनिधींनाच गुलदस्त्यात ठेवले आहे. तर काही वरिष्ठ नेत्यांनी अशा पदाधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.
काहींनी आपापल्या गटांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होईपर्यंत कोणतीही भूमिका जाहीर करू नका, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. मतदार याद्यांतील गोंधळामुळे निवडणुका लांबल्या, तर मोठ्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागेल, या भीतीने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला फारशी संधी नसते. कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या चिन्हाशिवाय जिल्हा परिषद निवडणूक अडचणीची ठरू शकणार आहे. जर जिल्हा परिषद निवडणूक मध्ये टोकाची भूमिका घेतली तर गोकुळ किंवा जिल्हा बँकेच्या राजकारणात नेत्यांकडूनच फाट्यावर मारले जाते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपेक्षा गोकुळ किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांना अधिक महत्त्व दिले जाते. शिवाय कार्यकर्त्यांची आर्थिक गरज देखील सहकारातील या संस्थेवर अवलंबून आहे.
त्यामुळे, जिल्हा परिषदेच्या राजकीय घडामोडीत सोयीच्या राजकारणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोण इच्छुक कोणत्या पक्षासोबत जाईल किंवा त्याच पक्षात राहिल का? याबाबत शंका घेतली जात आहे. त्यात मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराचे नाव दोन-दोन, तीन-तीन गटांत असल्याचे उघड होत आहे.
काहींच्या बाबतीत तर एकाच व्यक्तीचे नाव जिल्हा परिषदेच्या गटासोबत महापालिका प्रभागातही दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निवडणूक तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
दुबार मतदारांमुळे निवडणुकीचे 'राजकीय गणित' पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. प्रत्येक गटात काही शेकडो मतांचा फरक निर्णायक ठरत असतो. त्यातच जर एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्यास, कोणत्या ठिकाणी तो मतदान करेल, हे ठरवणे अशक्य होते. त्यामुळे उमेदवारांची गणिते गडबडणार हे निश्चित. या सर्वांची धास्ती इच्छुकांनी घेतली आहे.
त्यामुळे सहाजिकच जिल्हा परिषदेमध्ये फटका घेऊन सहकाराच्या निवडणुकीत उतरणार्या कार्यकर्त्यांचा सावध पवित्र आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक सत्तेचा प्रश्न नाही, तर पुढील दोन मोठ्या सहकारी रणांगणांचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय राजकीयदृष्ट्या वजनदार ठरतो. मतदार याद्यांतील गोंधळामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय अनिश्चितपणा आहे.
निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कुणी गोकुळ, कुणी जिल्हा बँक, तर कुणी सेवा संस्था यांच्याशी आपले जाळे घट्ट करत आहेत; परंतु मतदार याद्यांतील गोंधळामुळे आता हे सर्व थोडे थंडावले आहे. एका पक्षाचा झेंडा उचललेला इच्छुक निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेण्यासाठी सावध भूमिका घेताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.