
Pandharpur, 31 May : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करण्यात येतील, असा शब्द दिला होता. राज्यातील धनगर समाजाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य सरकारने अजूनही केंद्राकडे केलेले नाही. एवढेच नव्हे तर अर्थमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या महामंडळांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाही, त्यामुळे फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे शनिवारी (ता. 31 मे) पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. दरम्यान, लक्ष्मण हाके यांची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. त्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली होती, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले, राज्यातील धनगर समाजाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले होते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. राज्यात महायुतीची सत्ता आली पण धनगर समाज आणि ओबीसींचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
धनगर समाजासह ओबीसींनी मोठ्या अपेक्षेने महायुतीला भरभरून मतदान केले. महायुती सत्तेवर आल्यामुळे ओबीसींचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उलट धनगर समाजाची अडवणूक होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही महायुतीला मतदान केले. पण, देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसींचा विश्वासघात केला आहे, अशी टीकाही हाके यांनी केली.
निधीची अडवणुकीवरूनही लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील व्हीजेएनटी, ओबीसी कल्याण, भटके विमुक्त यासह अनेक मंडळांचा सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी थांबवला आहे, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
राज्य सरकारने सारथीची इमारत एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल, अशी उभारली आहे. पण महाज्योतीसाठी अद्याप साथं कार्यालयही सरकारने दिलेलं नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शहरामध्ये वसतिगृहही नाही. आमच्या समस्या सुटत नसतील तर सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करांव लागेल, असा इशाराही हाकेंनी दिला आहे.
ओबीसींचे प्रश्न सुटत नसतील तर आम्हाला सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल. धनगर आणि ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा धनगर समाज महायुतीच्या विरोधात लढा उभा करेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
अजितदादांवर काय टीका केली होती?
आमची ‘पीएच.डी.’ची पोरं अजितदादा पवारांकडे खेटं घालून घालून दमली आहेत. ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी अजितदादा पवार देतात. तेच अजितदादा ओबीसींच्या महामंडळाला दोन पाच कोटी रुपये देऊ शकत नाहीत का? अजितदादा पवारांना का पाहिजे अर्थमंत्रिपद? कायम तेच अर्थमंत्री का? अजितदादा पवारांची अर्थशास्त्रात काय पीएच.डी. झाली आहे का? अजितदादांना अर्थशास्त्राचा एखादा फॉर्म्युला कळतो का? अजित पवार आणि सामाजिक न्याय यांचा काहीही संबंध नाही. अजितदादा पवार हे पोल्ट्री चालवणारे माणूस आहेत. काकाच्या जिवावार राजकारणात आले. सामाजिकदृष्ट्या मागास लोकांच्या बाबत त्यांनी प्रचंड अन्याय लावला आहे, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.