

Solapur, 19 January : अवघ्या महिनाभरापूर्वी एकत्रिपणे लढून बलाढ्य परिचारक गटाची सत्ता उलथवून टाकणाऱ्या भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीला तडे गेल्याचे दिसून येत आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत विचारात न घेतल्याने परिचारक गटातील सहा ते सात नगरसेवक नाराज झाले आहेत, त्यामुळे पंढरपुरात भालके गटातील नाराजीनाट्याची चर्चा रंगली आहे.
पंढरपूर (Pandharpur) नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देत भगीरथ भालकेंच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीने माजी आमदार प्रशांत परिचारक गटाची १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यासाठी पंढरपुरातील अनेकांनी भालके गटाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली होती.
नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार परिचारक गटाच्या विरोधात लढण्यासाठी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत, शिवसेनेचे महेश साठे, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांनी साथ दिली होती. या सर्वांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत ११ नगरसेवक निवडून आणले होते, त्यामुळे त्यांना एक स्वीकृत नगरसेवकपद मिळाले आहे.
नागेश भोसले यांच्यासाठी चौघांनी माघार घेतली होती. त्यावेळी भोसले यांनी त्या चौघांपैकी एकाला स्वीकृतपदी संधी देण्याचे मान्य केले होते. स्वीकृतपदी आम्हाला चौघांना संधी तर दिलीच नाही, पण तो निवडताना साधे विचारलेसुद्धा नाही, असे राजन थोरात यांनी स्पष्ट केले.
भगीरथ भालके यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी राहुल शिंदे-नाईक यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला. वास्तविक या पदाचा निर्णय घेताना भालके यांनी नगरपरिषद निवडणुकीत एकत्र आलेल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे न करताना शिंदे-नाईक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे इतर सर्व सहकारी नाराज झाले आहेत.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याने भालकेंची काही सहकारी नाराज झाले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील सहा नगरसेवकांनी एकत्र येऊन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
याबाबत भगीरथ भालके म्हणाले की, स्वीकृत नगरसेवकाची निवड सर्वांना विश्वासात घेऊनची केली आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीत कोणीही नाराज नाही. निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी द्यायची नाही, असं आमचं ठरलं आहे.
निवडणुकीपूर्वी आम्हाला वेगळी आणि निवडणुकीनंतर वेगळी वागणूक मिळत आहे. निवडणूक झाल्यानंतर एकदाही फोन आलेला नाही किंवा बैठकीला बोलावले नाही, असे नगरसेवक प्रणिता घाडगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.