
Sangli News : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक विरोध होत आहे. जिल्ह्याच्या 15 गावांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात 12 ग्रामपंचायतींनी थेट ग्रामसभा घेत महामार्ग रद्दचा ठराव केला आहे. पण हा विरोध डावलून तो रेटण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत. यामुळे सांगलवाडीतील शेतकऱ्यांनी आपल्या रक्तानी पोस्ट कार्ड लिहत ती मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. तसेच हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी करत आहे. मात्र राज्यातील महायुती सरकारने तो पुढे सरकवला आहे. तर या महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. तशी कबूली सर्व आमदारांनी दिल्याचे फडणवीस यांनी नुकताच सांगितलं होतं.
यामुळे मागणी नसताना ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट महायुती घालत असल्याचा दावा आता शेतकरी करत आहेत. तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव देखील करण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आपल्या मागणीसाठी सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. सांगलवाडीतील राममंदिर चौकात बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत रक्त बाटलीत काढून बोरूने मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहली आहेत. या पोस्ट कार्डवर बाधित शेतकऱ्यांनी, माझी जमीन बागायती असून, महामार्गासाठी द्यायची नाही. या महामर्गामुळे या परिसराला महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावीत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान नांदेड येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे सांगून शक्तिपीठला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच, मी सर्व आमदारांशी चर्चा केली असून यात सांगलीचे आमदार-खासदारांचा समावेळ होता. या सर्वांनी महारामार्गाला कोणताच विरोध नसल्याचे सांगितले आहे.
पण सांगलीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आमदार-खासदारांचा समावेश होता. त्यांना फडणवीस यांनी विचोरले का? ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात घोळत असून असंतोष वाढत आहे.
यामुळेच मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहण्याचे आवाहन बाधित शेतकऱ्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्तानी पोस्ट कार्ड लिहली. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, उमेश देशमुख, महेश खराडे, हरिदास पाटील, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.