
Kolhapur News : ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला लक्ष केलं आहे. राज्यभर ऑपरेशन टायगरमधून राजकीय भूकंप घडवून आणला जात असून कोकणात मोठ्या प्रमाणात शिवसेना फोडली जातेय. कोकणात राजन साळवी, सुभाष बने यांना शिवसेनेत घेतलं आहे. यानंतर आता आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक यांना उघड ऑफर देण्यात आली आहे. यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत असून ठाकरे आपली शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यादरम्यान वैभव नाईक पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे. त्यांनी, 'टायगर-बियगर काय नाय, हे तर फोडाफोडीचं ऑपरेशन' असल्याची टीका केली आहे. ते कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर असं नाव दिलेलं आहे. मात्र खरंतर त्यांचं ऑपरेशन गद्दारी सुरू आहे. जे आधी गेले नाहीत त्यांना आता गद्दारी करण्यासाठी जुने गद्दार भाग पाडत आहेत, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे. तर संतोष देशमुख यांची हत्या होऊन 70- 80 दिवस झाले. अद्याप देखील आरोपी सापडत नाही. राज्यातले कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस दिवसेंदिवस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पंख छाटत आहेत. फडणवीस शिंदेंच्या आमदारांचे पंख छाटत आहेत. या सगळ्या गोष्टींवरून फक्त लक्ष विचलित करण्यासाठी ऑपरेशन टायगरचा प्रयत्न करत केला जातोय, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
तसेच वैभव नाईक यांनी, शिवसेना उभी करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाम असून ज्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री बनवलं असे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत आज त्यांच्यावर टीका करत आहेत. पण टीका करणाऱ्यांना देखील उद्धव ठाकरे शिवसेना उभी करतील, ते इतरांना आमदार आणि मंत्री करतीय याची माहिती आहे. यामुळेच त्यांचा आता खटाटोप सुरू असल्याची टीका देखील वैभव नाईक यांनी केला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक धक्के देत आहे. कोकणात ठाकरे गटाला धक्का देताना, राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उडवून आणला होता. यानंतर शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे देखील शिंदे गटात येतील, असा दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी दावा करताना शिरसाट म्हणाले होते की, ठाकरेंकडे खासदार आहेतच किती? यातीलही तीन चार गैरहजर असतात. उद्धव ठाकरे बैठक घेतायत, याचे कारण ते आपले खासदार आहेत का? याचा आढावा घेतात. याच्याआधी राजन साळवी आमच्याकडे येणार नाही असे म्हणत होते. पण ते आता आले ना. वैभव नाईक आणि भास्कर जाधव देखील येतील, असे शिरसाट यांनी वक्तव्य केलं होते.
तर गोगावले यांनी वैभव नाईक यांच्या प्रवेशाबाबत दावा करताना, वैभव नाईक यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. ते आमच्या संपर्कात आहेत. सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात. काही गुप्त ठेवाव्या लागतात. परंतु योग्य वेळेला खुलासा केला जाईल, असे सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं होतं.
यानंतर वैभव नाईक यांनी आपण शिवसेना सोडणार नसून उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले होते. तर आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवताना जोरदार टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.