Gore Attack On Desai : मी आमदार हाय, माझ्याशिवाय तुमचं काम होणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याकडून दमबाजी, जयकुमार गोरेंचा आरोप
Karad, 02 February : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे जिल्हा परिषद गट हा विशिष्ट भितीच्या छायेखाली असल्याचे मी अनेक वर्षे पाहत आहे. विकासावर चर्चा न करता, माझ्याकडे आल्याशिवाय कोणतेही विकासकामं होणार नाहीत, आमच्याकडे आल्याशिवाय चालणार नाही, असे सांगून कार्यकर्त्यांना दबावात ठेवण्याचे काम झाले आहे. या भागातील, पाटण तालुक्यातील जनता दहशतीखाली आहे,अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला.
तांबवे, पाटण तालुका आणि जिल्ह्यातील कोणत्याही गटातील जनतेने घाबरू नये. कारण, भाजप आपल्या पाठिशी आहे, कोणताही प्रशासकीय दबाव येथे चालणार नाही, मग भले पालकमंत्री कोणीही असला तरी काहीही फरक पडणार नाही, अशी तोफ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आपलेच सहकारी शंभूराज देसाई यांच्यावर नाव न घेता डागली.
तांबवे गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale), माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, अण्णासाहेब पाटील, शंकर पाटील, विजय चव्हाण, विश्वासराव निकम, विनोद पाटील, अमित नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, गावखेड्यातील लोकांसाठी पायाभूत सुविधा झाल्या पाहिजेत. या पायाभूत सुविधा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आपल्याकडे आहे. आमदार मी आहे, तुमचे काम माझ्याशिवाय होणार नाही, आले काम तरी होऊ देणार नाही, असे पाटणमध्ये सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्था ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात, हेही आपण लक्षात ठेवावे. ग्रामविकास विभागाकडे गावांच्या विकासाच्या अनेक योजना आहेत. ग्रामविकास विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठिशी असल्यावर विकासाची काहीही चिंता करण्याचे काम नाही, असा विश्वास गोरे यांनी दिला.
पाटण तालुक्यातील जी-जी कामे आहेत, ती सत्यजित पाटणकरांनी एसएमएस करून सांगावीत, ती मार्गी लावू. मात्र, कोणाच्याही दबावात तुम्ही राहू नका. सर्व योजना या सरकारच्या आहेत, कोणाच्या मालकीच्या नाहीत, मात्र काही लोकांना भ्रम झाला आहे, असे टोला गोरे यांनी देसाई यांना लगावला.
मंत्री गोरे म्हणाले, केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारने गावखेड्यातील लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे कऱ्हाड पंचायत समितीची सत्ता भाजपच्याच ताब्यात आली पाहिजे, त्यासाठी कामाला लागावे. कोणत्याही गावातील कसलेही काम भाजपचा कार्यकर्ता घेऊन आला तर त्याला अडचण येऊ देणार नाही.
छोट्या-छोट्या कार्यकर्त्याला दम देऊन वेठीस धरण्याचे काम केले जाते. आम्ही कोणाच्या वाट्याला जाणार नाही. मात्र, आमच्या लोकांना त्रास झाला तर आम्ही थांबणार नाही. सत्ता आली म्हणून दादागिरी करुन चालणार नाही. दम देऊन जिंकता येत नाही. लोकांसाठी काम केले पाहिजे, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
उंडाळकरांचे तांबवे गटात काहीच चालत नाही : भोसले
जेष्ठ नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांच्यानंतर त्यांचे तांबवे गटात काहीच चालत नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना लगावून भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी घड्याळ्यावरील उमेदवारही त्यांना तांबवे या गटात उभे करता आलेले नाहीत. त्यांचे काहीच या मतदार संघात चालत नाहीत. काकांच्या पश्चात तुमचे सर्व काही चांगले फक्त भाजपच करु शकते, त्यामुळे यावेळी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

