
Akkalkot, 09 December : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अक्कलकोट मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी चिंतन बैठकीत मोठे विधान केले आहे. काँग्रेस सोडून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. पक्षात राहूनच नवे नेतृत्व तयार करणार असून कार्यकर्त्यांना यापुढेही ताकद देत राहणार आहे. अक्कलकोटमध्ये मी उमेदवार नसतो तर काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला असता, असा दावाही म्हेत्रे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अक्कलकोटमध्ये (Akkalkot) काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उद्योजक लाला राठोड, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, कॉंग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे.
सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) म्हणाले, मी थांबायला पाहिजे, असं काहींचं म्हणणं होतं. मीही या वेळी निवडणूक लढवणार नव्हतो. पण, काँग्रेस पक्षाकडे तोडीस तोड उमेदवार नव्हता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मी उभा राहिलो. मल्लिकार्जुन पाटील किंवा अन्य कोणीही उभारले असते, तर त्यांचा मानहानीकारक पराभव झाला असता. कारण, त्यांची तेवढी ताकद अजूनही निर्माण झालेली नाही.
निवडणुकीत एक चेहरा लागतो. अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जुन पाटील यांची तेवढी ताकद अजून निर्माण झालेली नाही. मल्लिकार्जुन पाटील असू किंवा आणखी कोणी, त्यांना आगामी पाच वर्षांत ताकद तयार करावी लागेल. नवे नेतृत्व कोणीही असले तरी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीन, असे माजी राज्य मंत्री म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आघाडीवर खोटे आरोप करून सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी लाट असतानाही 2014 मध्ये मी साडेसतरा हजार मताधिक्याने निवडून आलो होतो. पण, पुढील 2019 च्या निवडणुकीत म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. पण या 2024 च्या निवडणुकीत मोठा प्रतिसाद होता. सुमारे 30 हजाराच्या मताधिक्याने निवडून येईन, अशी खात्री होती. पण, तब्बल 50 हजाराने मी पराभूत झालो, असेही म्हेत्रे यांनी म्हटले आहे.
म्हेत्रे म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभावामुळे खचून जाऊ नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात करा. मी गेल्या 32 वर्षांपासून राजकारणात आहे. मला सर्वांनी भरभरून सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. सकाळ एक आणि संध्याकाळी दुसरे बोलणे आणि फसवेगिरी करणे, म्हेत्रे परिवाराच्या रक्तात नाही.
आम्ही संघर्षातून तयार झालो. नव्या नेतृत्वालाही संघर्ष करूनच पुढे यावे लागेल. मोर्चे, आंदोलन करून नेतृत्व सिद्ध करावे लागेल. नेतृत्वासाठी पुढे येणाऱ्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. पक्षासाठी प्रत्येकांनी वेळ द्यावा. दररोज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधावा लागेल, असे म्हेत्रे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.