
Solapur, 06 May : विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला 19 दिवस होऊनही पोलिस अद्यापही ठोस निष्कर्षांपर्यंत पोचू शकलेले नाहीत. डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या अटकेपुढे पोलिस जाऊ शकलेले नाहीत. या प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणी आता नवीनच मागणी झाली असून डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी 18 एप्रिल रोजी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली हेाती. डॉ. वळसंगकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून 19 एप्रिल रोजी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये काम करणारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली. तिला सुरुवातीला सुरुवातीला तीन आणि त्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर तिच्याकडून कोणतीही नवी माहिती नसल्याने पोलिसांची तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यानुसार मुसळे माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत मुलाची आणि सूनेचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांना (Police) अद्याप या प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी अनेक गोष्टी गूढ असून त्याबाबतचे प्रश्न कायम आहेत. मुळात डॉ. शिरीष वळसंगकर यांनी बाथरूमध्ये आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पण त्यांची पिस्तूल ही बेडरूमध्ये सापडली आहे, त्यामुळे पिस्तून बेडरूमध्ये कोणी नेली, असा सवाल उपस्थित होत आहे.
याशिवाय, मनीषा मुसळे माने हिने दिलेला माफीनामाही डॉक्टरांच्या बेडरूमध्ये सापडला, तसेच डॉक्टरांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर त्यांनी उपचारासाठी नेण्यात आले, त्यावेळी अंगावरील कपडे रक्ताने माखले होते, त्या वेळी कपडे फाडून काढण्यात आले होते. तरीही शवविच्छेदनावेळी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचे म्हटले होते, त्यामुळे सुसाईड नोट नेमकी नेमकी सापडली कुठे? तसाच संशय पिस्तूलबाबत आहे, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, डॉ शिरीष वळसंगकर यांनी आत्हत्या केली असून त्याप्रकरणी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वळसंगकर हे ब्राम्हण समाजाचे भूषण होते. त्यांनी अनेक सामाजिक मदत केलेली आहे.
मी देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करतो, की वळसंगकर प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे काही झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी. सीआयडीने यात हस्तक्षेप केला पाहिजे. कोट्यवधी रुपयांचा भांडाफोड आणि त्यांच्या नातेवाईकांवर काही आरोप झाले आहेत. या सर्व प्रकरणी तू तू मै मै चालेली असताना पोलिस चौकशीला बगल देत असाताना ब्राम्हण समाजाच्या वतीने फडणवीसांना ही चौकशी सीआयडीकडे देण्याची मागणी करतो, अशी मागणी अजित कुलकर्णी यांनी केली आहे.
स्थानिक पोलिस यात चौकशी करत आहेत, यात कोणतेही दुमत नाही. पण यातून काहीतरी वेगळं प्रकरण बाहेर पडू शकतं, त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडीची चौकशी लावावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राम्हण समाजाच्या वतीने कुलकर्णी यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.