
Pune, 10 August : विधानसभा निवडणुकीत 160 जागा जिंकून देण्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींना घेऊन मी राहुल गांधी यांना भेटायला गेलो होतो. पण, त्या दोन व्यक्तींची नावे मला आठवत नाहीत, हा शरद पवारांचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खोडून काढला आहे. किती खोटं बोलावं, याला एक सीमा आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांना भेटायला येणाऱ्यांची नोंद ठेवली जाते, त्यामुळे त्या दिवशीची नोंद पाहिल्यास त्या दोघांची नावे कळू शकतात, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन व्यक्ती मला भेटायला आल्या हेात्या, त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. असे विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता. 09 ऑगस्ट) नागपुरात केले होते. ते करताना त्यांनी त्या दोघांची नावे आठवत नसल्याचे म्हटले होते. त्यावरून आंबेडकर यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) म्हणाले, राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना मंत्र्यांचा दर्जा असून त्याच प्रकाराची सुरक्षा त्यांना असते. त्यांच्याकडे कोण येतं आणि कोण जातं, याची नोंद ठेवली जाते. शरद पवार यांचा दर्जा पाहता त्यांची नोंद होणार नाही, याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यांना भेटण्यासाठी मुभा असते. पण, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांची नोंद राहुल गांधींच्या घराबाहेर असलेल्या त्या रजिस्टरमध्ये आहे.
त्या दिवसाचं रजिस्टर काढलं, तर शरद पवारांसोबत आलेल्या दोन व्यक्तींची नावं जाहीर केली जाऊ शकतात. तुम्ही सामान्य माणसाला फसवू शकता. पण, राजकीय कार्यकर्त्यांना फसवू शकत नाही, असा टोला आंबेडकर यांनी पवारांना लगावला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांनी केलेला दावा मी खोटा म्हणणार नाही. कारण बाजारात अशी लोकं आहेत, जी ऑफर देतात. शरद पवार आणि राहुल गांधी यांनी हे त्यावेळीच पोलिसांना सांगितलं असतं तर त्या दोन जणांमार्फत हे शक्य आहे का? ही परिस्थिती पाहिली पाहिजे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याला शरद पवार यांनीही पुष्टी दिली होती. त्याबाबत आंबेडकरांनी या दोन्ही पक्षावर खरपूस शब्दांत टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतचोरीची तक्रार म्हणजे वरातीमागून घोडे आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, मतचोरीच्या प्रकरणात आम्ही त्यांना म्हणालो होतो की, आपण सर्वजण मिळून न्यायालयात जाऊ. पण, त्यावेळी आमच्यासोबत कोणीच आलं नाही. न्यायालयाच्या माध्यमातून दूध का दूध आणि पानी का पानी होऊ शकतं. दुर्दैवाने त्या वेळी ते न्यायालयात गेले नाहीत. पण, आता बोंबलत बसले आहेत, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.