Kolhapur News: विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला. महायुतीमध्ये उमेदवारीवरून गोची निर्माण झाल्यानंतर महायुतीतून महाविकास आघाडीकडे जात माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात स्पर्धा लागली. मात्र माजी आमदार के पी पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ए वाय पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली.
महायुतीकडून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून माजी आमदार के पी पाटील तर अपक्ष ए वाय पाटील अशी तिरंगी लढत झाली. प्रचारादरम्यान एकमेकांवर तोंड घेतले. मात्र निकालानंतर आबिटकर यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी ए वाय पाटील यांनी राधानगरीत फलक झळकवले. त्यानिमित्ताने राधानगरीच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्याने राजकीय सोयरीक जुळली आहेत.
राधानगरीत झालेल्या तिरंगी लढतीत सर्वाधिक चर्चा ही मेहुण्या पाहुण्यांची होती. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देऊन देखील यंदाच्या निवडणुकीत शब्द फिरवल्याने माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात त्यांचेच दाजी ए वाय पाटील रिंगणात उतरले. सुरुवातीला दुरंगी लढत होत असल्याचे दिसले. मात्र ए वाय पाटील यांच्या उमेदवारीने खरी रंगत आणली. माजी आमदार के पी पाटील यांनी हाच मुद्दा घेत माझ्या पराभवासाठीच ए वाय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असा प्रचार सुरू केला. त्यामुळे ही लढत चांगलीच चर्चेत आली.
ए वाय पाटील यांच्या उमेदवारीचा फटका माजी आमदार के पी पाटील यांना बसला. विधानसभेच्या निवडणूक निकालात आमदार प्रकाश आबिटकर हे विजयी झाले. तिरंगी लढत झाल्याने के पी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. मेव्हण्याच्या पराभवाला दाजी कारणीभूत ठरल्याने त्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालात देखील आबिटकर आणि ए. वाय. पाटील एकत्र होते. तर विधानसभेत एकमेकांच्या विरोधात.
आबिटकर यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ए वाय पाटील यांनी विमानतळ येथे जाऊन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत केले. तर नुकत्याच पार पडलेल्या राधानगरी तालुक्यातील सत्कार समारंभात ए वाय पाटील यांची पोस्टरबाजी लक्षवेधी ठरली.
महायुतीत असलेले ए.वाय.पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीत देखील स्वतंत्र भूमिका घेतली. राज्यात विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ए.वाय. पाटील यांना महायुतीमध्ये जाण्याचे वेध लागले असल्याची चर्चा आहे. त्यांच्याही भाजपमध्ये किंवा पुन्हा स्वग्रही राष्ट्रवादीत परतण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यापूर्वी त्यांनी अनेकांकडे विचारपूस करून चाचणी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.