
Kolhapur News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून जवळ जवळ दोन महिन्यानंतर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केलीय. मात्र यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपमध्ये नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेत भरत गोगावले आणि दादा भूसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही नाशिकमध्ये नाराजी उफाळली आहे. अशा प्रकारे महायुतीच्या तिन्ही पक्षात नाराजीचा सूर उमटत असतानाच शांत असणाऱ्या कोल्हापुरमध्ये देखील शिंदेंच्या जवळच्या नेत्याने आपली नाराजी थेट व्यक्त केली आहे. यामुळे महायुतीतील मंत्रीपदानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यावरून कलह सुरू झाला आहे.
राज्यात नुकत्याच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. यानंतर सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीची ठिणगी पडली. रायगडचे पालकमंत्रिपद जिल्ह्यात फक्त एकच आमदार असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेले. अदिती तटकरे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले नाराज झाले आहेत. त्यांनी याबाबत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
गोगावले यांनी, हा आमच्या मना विरुद्ध घडलेला प्रकार असून आम्ही नाराज आहोत. कार्यकर्त्यांच्या घरामध्ये चुलीपर्यंत मी जाऊ शकतो. मात्र मला डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांना शांततेचं आवाहन केल्याचे गोगावले यांनी म्हटले होते. यानंतर रायगडच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती थांबवण्यात आली आहे.
असाच काहीसा तिढा नाशिकमध्ये निर्माण झाला असून नाशिकमध्ये देखील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. येथे भाजपने गिरीष महाजन यांना पाठवले होते. मात्र शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि मंत्री मणिकराव कोकटे असताना दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री जिल्ह्याला नको म्हणत विरोध सुरू झाला आहे.
सध्या राज्यात रायगड आणि नाशिकवरून पालकमंत्री नियुक्तीवर तेढ निर्माण झाला असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड मिळायला हवं होतं अशी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षात पालकमंत्री नियुक्तीवरून नाराजी असल्याचे समोर येत आहे.
सध्या याची चर्चा राज्यभर सुरू असतानाच कोल्हापुरमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीनाट्य उघड झाले आहे. एकीकडे तिसऱ्यांदा आमदार झालेल्या पण प्रशासनातील कोणताच अनुभव नसलेल्या प्रकाश आबिटकर यांना थेट कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. यामुळे आधीच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके नाराज झाले होते. यामुळेच त्यांनी आबिटकर यांच्या जिल्ह्यातील सत्काराला दांडी मारली होती.
त्यानंतर आता क्षीरसागर यांनी, भोई समाजाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभावेळी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. क्षिरसागर यांनी, माझ्या आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत कायमच उलट झालं आहे. नाही तर या कार्यक्रमाला आज मी पालकमंत्री म्हणून आलो असतो. पण आता प्रकाश आबिटकर पालकमंत्री आहेत. राजेही नाशिकमधून खासदार झाले असते. पण तसे झाले नाही. ताकद असूनही त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यांनी शाहू महाराजांच्या मागे उभे राहणे पसंत केले. शाहू महाराजांच्या विजयासाठी राबले. त्यामुळे शाहूंचा विजय हा शाही घराण्याचा विजय आहे, हे घराणे नेहमीच जनतेत असतं, असेही क्षीरसागर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.