

ओमानवरून १८०० मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन आलेले जहाज जयगड बंदराजवळ समुद्रात अडकले आहे.
कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव जहाजाला बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान संदर्भामुळेही या प्रकरणात अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे.
Ratnagiri jaigad port news : रत्नागिरीतील जयगड बंदरानजीक अरबी समुद्रात सध्या एका गॅसवाहू जहाजावरून हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. ओमानवरून १८०० मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन जयगड बंदराकडे निघालेले हे जहाज सध्या किनाऱ्यापासून दूर समुद्रात उभे आहे. जहाजाच्या मालकांच्या ‘भारत विरूद्ध पाकिस्तान’ भूमिकेमुळे हे जहाज सध्या ‘ना घरचे ना घाटचे’, अशा अवस्थेत आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने जहाजाला बंदरात नांगरून ठेवण्याची परवानगी नाकारल्याची माहिती रत्नागिरी बंदर विभागाने दिली.
या जहाजाच्या प्रवेशावरून मोठी खळबळ उडाली असून, त्यामागील कारणही धक्कादायक आणि रंजक आहे. या जहाजाचे दोन मालक आहेत. ओमानहून आलेले हे जहाज जयगड बंदरात दाखल होणार होते; परंतु ऐनवेळी दोन मालकांमधील अंतर्गत वाद उफाळून आला. एका मालकाच्या मते हा व्यवहार भारतीय बाजारपेठेसाठी झाला आहे. तर दुसरा मालक हा गॅस पाकिस्तानच्या दिशेने वळविण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाचा थेट परिणाम जहाजाच्या कायदेशीर कागदपत्रांवर झाला आहे.
बंदरात प्रवेश करण्यासाठी आणि मालाची उतरवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या मालकी हक्काच्या वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. बंदर विभागाने याप्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे नियमानुसार या जहाजाला जयगड बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
जोपर्यंत दोन्ही मालकांमधील हा वाद सुटत नाही किंवा कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता होत नाही, तोपर्यंत या जहाजाला बंदरात थारा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साधारणपणे तांत्रिक बिघाड किंवा हवामानामुळे जहाजे थांबवली जातात; पण वादामुळे जहाज समुद्रात लटकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पाकिस्तानशी थेट संबंध नाही
दरम्यान, या जहाजाचा किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानशी संशयास्पद संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले होते; मात्र, बंदर विभागाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. जहाजाचा पाकिस्तानशी कोणताही थेट संबंध नसून, केवळ दोन मालकांच्या व्यावसायिक वादामुळे आणि अपुऱ्या कागदपत्रांमुळेच ते समुद्रात उभे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
1. हे जहाज कुठून आले आहे?
हे जहाज ओमानवरून एलपीजी गॅस घेऊन भारतात आले आहे.
2. जहाज बंदरात का थांबवले गेले नाही?
कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारला गेला.
3. जहाजात किती गॅस आहे?
या जहाजात सुमारे १८०० मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे.
4. या प्रकरणात भारत-पाकिस्तान मुद्दा कसा जोडला गेला?
जहाजाच्या मालकांच्या भूमिकेमुळे या मुद्द्याला राजकीय रंग मिळाला आहे.
5. सध्या जहाज कुठे आहे?
हे जहाज जयगड बंदराजवळ समुद्रात उभे आहे आणि परवानगीची प्रतीक्षा करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.