Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधानपरिषद आणि विधानभेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी विधिमंडळाच्या बाहेरही आंदोलन करत घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली. यात मंत्र्यांनी भाजपकडून सातत्याने गळचेपी होतं असल्याचा आरोप करत राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
पण ज्या बापू उर्फ दिनकर शिंदे यांचं अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून आधी सातारा जिल्हा परिषदेत आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात रामायण घडले त्यांनी आपलं अपहरण झालं नसल्याचं तिसऱ्यांदा सांगितलं आहे. शिंदे यांना आज (23 मार्च) दाखल गुन्ह्यासंदर्भात जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठासून आपलं अपहरण झालंच नव्हतं, आपणं स्वखुशीने पक्षासोबत होतो, असा जबाब दिला आहे.
यामुळे पोलीस अधिक्षक तुषार दोशींसह राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानापूर्वीच जिल्हा परिषदेतून अटक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरूण देवकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बापू शिंदे यांच्या जबाबानंतर हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित ठरू शकतो, त्यामुळे केलेली अटकेची कारवाईही राजकीय दबावातून झाली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. विधानपरिषदेतून यापूर्वीच दोशींसह, देवकर आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या 100 पोलिसांचे निलंबन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वीही दोनवेळा दिला होता जबाब :
अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्या अटकेपूर्वी आणि अटकेवेळी ज्या बापू शिंदे यांचं अपहरण झाल्याची तक्रार होती त्यांनी आपलं अपहरण झालं नसल्याचा दोनवेळा जबाब दिला होता. बापू शिंदे महाबळेश्वर पाेलिस ठाण्यात रात्री 12 वाजता पाेहाेचले. मात्र, त्यांना ‘साताऱ्या’त जाण्यास सांगितलं. तेव्हा ‘शंभूराज देसाई यांनी थेट ‘एसपीं’ना काॅल केला. ‘मकरंदआबां’नीही पहाटे 4 वाजता ‘वाई’च्या ‘डीवायएसपीं’ना झाेपेतून उठवलं. अखेर पहाटे 5 वाजता ‘वाई पाेलिस ठाण्या’त ‘माझं अपहरण झालेलं नाही. आमच्या मंडळींना विनाकारण त्रास देऊ नये,’ असा लेखी जबाब दिला.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बापू उर्फ दिनकर शिंदे यांचं अपहरण झाल्याचा आरोप करत त्यांचाच मुलगा विकास शिंदे याने तक्रार दिली. याच तक्रारीच्या आधारे राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी महाबळेश्वरमध्ये सदस्य मुक्कामी असलेल्या हॉटेलवर जाऊन झडती घेतली. पण हाती लागले नाही. या झडतीनंतर अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करणार अशी चाहूल मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांना लागली.
खबरदारीचा उपाय म्हणून स्वतः मंत्र्यांनी या सदस्यांना आपल्या गाडीतून थेट जिल्हा परिषदेत आणले. मकरंद आबा आणि शंभुराज देसाई या सर्वांना सभागृहाकडे घेऊन जात होते. त्याचवेळी जिन्यात या दोघांनाही अटक करण्यासाठी पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलीस आणि शंभुराज देसाईंमध्येही बरीच झटापट झाली. पोलिसांनी मकरंद पाटील यांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या राड्यानंतरही पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना सभागृहात जाण्यापूर्वीच अटक केली. त्यांना अटक करून महाबळेश्वरला नेण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.