
Solapur, 23 June : सोलापूर भारतीय जनता पक्षातील नाराजीनाट्य काही केल्या संपायला तयार नाही. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर हे सोलापुरात आले होते.‘बुद्धिजीवी व प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद’ असा तो कार्यक्रम होता.
मात्र, सोलापूर भाजपमधील प्रभावी नेते असलेले आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती, त्यामुळे देशमुखांची नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. माजी पालकमंत्री देशमुख हे मतदारसंघातील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, भाजपच्या कार्यक्रमाला त्यांनी पुन्हा दांडी मारली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे सर्वाधिकार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिले होते. तेव्हाच सुभाष देशमुखांनी काहींसी तिरकस प्रतिक्रिया देत नाराजी दर्शविली होती. पण कल्याणशेट्टी यांनी देशमुखांच्या मतदारसंघातील विरोधक असलेल्या काँग्रेस नेत्यांशी हातमिळवणी करत पॅनेल उभे केले होते, त्यामुळे सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलच्या विरोधात कट्टर विरोधक असलेले सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) हे एकत्र आले होते. तेव्हापासून हे दोन्ही भाजपवर विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही दोन्ही देशमुख नाराज असल्याचे उघड झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मत्स्ये व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे सोलापुरात आले होते. मात्र, या मंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दोन्ही देशमुखांनी दांडी मारली होती.
यातील बावनकुळे, चंद्रकांतदादांनी सुभाष देशमुखांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमधील मतभेद वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, सोलापूर-गोवा प्रवासी विमानसेवेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता, त्या कार्यक्रमासाठी दोन्ही देशमुख स्टेजवर होते. मात्र, मुख्यमंत्री येऊ शकणार नाहीत, असे जाहीर होताच त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराजी दूर होणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ‘थिंक टॅंक’मधील प्रमुख म्हणून ओळख असलेले सुनील देवधर रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. मोदींच्या पंतप्रधानपदाला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात भाजपतर्फे बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भाजपमधील प्रभावी नेते असलेले सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे दोन्ही वरिष्ठ आमदारच गैरहजर होते, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा चर्चा होत आहे.
दोन्ही देशमुखांसोबत सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आमदारही अनुपस्थित होते. कार्यक्रमाला केवळ आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते, त्यामुळे देवधरांनी नेमक्या कोणत्या प्रभावी व्यक्तीमत्वांशी संवाद साधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुनील देवधरांनी काढली सुभाष देशमुखांची आठवण
सुभाष देशमुख यांच्या वतीने त्याचे चिरंजीव तथा सोलापूर बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात सुनील देवधर यांनी आमदार सुभाष देशमुख यांची आवर्जून आठवण काढली. सुभाष देशमुख खासदार असताना दिल्लीत आम्ही एकत्र काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.