
मोहोळचे माजी आमदार व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जोमाने सुरू केली आहे.
यावर प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांना खुलं आव्हान दिले आहे. मी नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर गट सोडून लढा. पराभव झाला तर मी राजकारण सोडेन, असे त्यांनी जाहीर केले.
उमेश पाटील यांनी स्वतःवर केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा संदर्भ देत स्थानिक संघर्ष, ताकदीचे वर्चस्व आणि चार वर्षांत ५० वर्षांचे साम्राज्य उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
Solapur, 18 October : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण लक्षात ठेवा तुम्हालाही मोहोळ, अनगरमध्ये यायचं आहे’ असा इशारा उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना दिला आहे.
उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, माझं राजन पाटील यांना आव्हान आहे की, माझ्याविरोधात लढा. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्याविरोधात लढा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देतो. मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण 'अपने गली में कुत्ता भी शेर होता है.'
माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसाही नाही. पण, आमच्यात हिंमत आहे. पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही स्वतःला म्हणवता. मग, हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देतो, असेही उमेश पाटील यांनी राजन पाटलांना (Rajan Patil) म्हटले आहे.
उमेश पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य देण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही, त्यामुळे चार वर्षांच्या कालावधीत तुमचं 50 वर्षांचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकलो, हे लक्षात ठेवा.
मी त्यांच्या (राजन पाटील) गावात (अनगर) एकटा गेलो होतो, तेव्हा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, याबाबत मी कुठेही वाच्यता केली नाही कारण आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने नव्हे; तर लोकशाहीच्या मार्गाने जाऊन त्यांचा पराभव करायचा आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
उमेश पाटील म्हणाले, एक म्हण आहे, 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है'. हे पण कारखान्यापर्यंत आले आणि हद्द संपली की माघारी गेले. पण, लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळमध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिला आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षांचं साम्राज्य उद्ध्वस्त केले आहे.
Q1: राजन पाटील भाजपमध्ये नक्की प्रवेश करणार आहेत का?
A1: सध्याच्या लेखानुसार त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा जोरदार आहे, परंतु अधिकृत घोषणा शिल्लक आहे.
Q2: उमेश पाटील काय आव्हान देत आहेत?
A2: उमेश पाटील म्हणतात राजन पाटील यांनी माझ्याविरुद्ध अनगर गट सोडून लढावं; जर मी हरलो तर राजकारण सोडेन.
Q3: का हा वाद उभा राहिला आहे?
A3: स्थानिक पक्षीय संघर्ष, सत्ता-वर्चस्वाची लढाई आणि उमेश पाटील यांच्या दावा केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे तणाव वाढला आहे.
Q4: या द्वंद्वाचे स्थानिक परिणाम काय असू शकतात?
A4: मोहोळ परिसरात पक्षविभाजन आणि उमेदवारांच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मतदान आणि प्रदेशात राजकीय हालचाली तीव्र होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.