

Solapur, 20 February (प्रमिला चोरगी) : सोलापूर शहरातील विविध मिळकतींवर बी टू सत्ताप्रकार हटविण्यासाठीच्या प्रस्तावावर खुद्द सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी प्रश्न उपस्थित करीत सदस्यांला उद्देशून म्हणाल्या, तुमचं नाटक लई झालं. मी बोलताना कोणी बोलायचं नाही. बी टू मुळे खरेदी-विक्री बंद आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभारत आहेत. अनधिकृत बांधकाम आहेत. यावर प्रशासन काय करत आहे, बी टू कोणासाठी आहे, ते सांगा? या वक्तव्यावरून सभागृह नेते नरेंद्र काळे व फुलारी यांच्यातच वादाला तोंड फुटले.
सोलापूर (Solapur) शहरातील विविध परिसरातील मिळकतींवर बी - टू असल्यामुळे खरेदी-विक्री बंद आहे. या ठिकाणी बांधकाम परवाने मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. हा बी टू उठल्यास जागांचे नियमित व्यवहार सुरू होतील, असा सभासद प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली.
या प्रस्तावावर विरोधकांऐवजी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील (BJP) नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. हा सत्ताप्रकार रद्द झाल्यास नेमका शहरातील किती मिळकतदारांना फायदा होणार आहे? मिळकतींची संख्या किती व ठिकाणे कोणती? अशी माहिती सभागृहाने द्यावे, अशी मागणी संजय कोळी, अनंत जाधव, श्रीदेवी फुलारी () यांनी केली. आपलाच प्रस्ताव आहे, नंतर बोलू असे महापौरांनी सांगितले. मात्र, तोंडी काही नको, आयुक्तांनी पुढच्या सभेत माहिती सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानंतर हा विषय थांबला.
दरम्यान सभागृहात या विषयावरून झालेला गोंधळ पाहता सत्ताधारीविरुध्द सत्ताधारी नगरसेवक अशीच स्थिती पहायला मिळाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांना पहिल्याच बैठकीत शिस्तीचे प्रशिक्षण दिले होते. पण आज सभागृह नेत्यांना सभागृहात शिस्तीचे नगरसेवकांनी पालन करावे, अशा सूचना पुन्हा कराव्या लागल्या.
शहर उत्तरचे विषय घेणार नाही का? : श्रद्धा पवार
महापालिका सभेत आज केवळ निवडी आणि अभिनंदनाचे प्रस्ताव आहे, असे सांगत मी दिलेला प्रस्ताव नाकारला. परंतु प्रत्यक्षात आज सभासद प्रस्ताव आहेत. मग माझे प्रस्ताव का नाकारले? शहर उत्तरचे विषय घेणार नाही का? असा प्रश्न नगरसेविका श्रद्धा पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर नगरसचिव यांनी मी त्यांना पहिल्यांदाच पाहतोय, मी ओळखत नसल्याचे उत्तर दिल्याने विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी नगरसचिवांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
श्रध्दा पवार ह्या शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग सातमधील भाजपच्या नगरसेविका आहेत. प्रभाग सातमध्ये तीन शिवसेना आणि एक भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. सध्या पक्षात आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्याविरोधात दोन देशमुख अशी गटबाजी आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांचे निकटवर्तीय असलेले किरण पवार यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी बीटूसह शहर स्वच्छतेसंदर्भात सभासद प्रस्ताव देण्यासाठी नगरसचिवांकडे गेले होते. मात्र नगरसचिवांनी त्यांचा प्रस्ताव घेतला नाही.
आजच्या सभेत हा प्रश्न उपस्थित करून पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या गटबाजीचा भांडाफोड पवार यांनी केला आहे. यावेळी पवार म्हणाल्या, मी दिलेला प्रस्ताव नगरसचिवांनी घेतला नाही. मग सभागृहात इतरांचा सभासद प्रस्ताव कसा आला? शहर उत्तरचे विषय अजेंड्यावर घेणार नाही का? अशी विचारणा केली.
यावर नगरसचिव यांनी मी त्यांना पहिल्यांदाच पाहतोय, मी ओळखत नसल्याचे उत्तर दिल्याने विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी नगरसचिवांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यावरून सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला.
तडवळकरांना ऐकवले
गटबाजीमुळे सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. तेवढ्यात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पवार यांच्या जवळ येऊन ‘सभागृह नेत्यांकडे विषयांचा प्रस्ताव देणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली. त्यावर पवार यांनी ‘मी आगोदर सभागृह नेत्यांकडेच गेले होते, त्यांनी मला निवडी आणि अभिनंदनाचे विषय आहेत. सभासद प्रस्ताव नाही, असे सांगितले. त्यानंतर मी नगरसचिवांकडे गेले त्यांनीही माझा विषय घेतला नाही, असा दुजाभाव योग्य नाही, असे तडवळकर यांना सुनावले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.