
Nagpur News : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला. दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली आणि त्याचा उद्रेक उडाला. दोन गट आमने-सामने आल्याने सोमवारी (ता.17) रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. ज्यात ज्यात अनेक वाहने जाळण्यात आली असून पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे येथील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपवली, शांती नगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीचा समावेश आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात असून सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे.
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय नेते मंडळी सभागृहात देखील यावरून वाद घालताना दिसत आहेत. तर राज्यातील हिंदुत्ववादी संघटना यावरून आक्रमक झाल्या असून कबर हटवण्याची मागणी करताना दिसत आहेत. तसेच जर सरकारने कबर न हटवल्यास ती कार सेवा करून हटवू असाही इशारा दिला होता. यानंतरच नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात आता जोरदार राडा झाला. मंगळवारी रात्री नागपुरात हिंसा भडकली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक करताना वाहनांची जाळपोळ केली. ज्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे नागपूर सध्या प्रचंड तणावाखाली आहे. तर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आतापर्यंत जवळपास 50 जणांना ताब्यात घेतलं आहे.
काल रात्री घडलेल्या दंगलीनंतर संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला आहे. आज (ता.18) सकाळी देखील येथे तणावपूर्ण शांतता असून येथे दगडफेक करण्यात आली तेथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून संचारबंदीही लागू करण्यात आली असून पाचपेक्ष जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, अशा सक्त सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
सोमवारी रात्री 12 पासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आली असून घरात राहा विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस गस्त घालत आहेत. सकाळपासूनच संचारबंदी लागू असलेल्या भागात पोलिसांच्या गाड्या फिरत आहेत. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच घडलेल्या घडनेनंतर आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून नागरिकांनी शांत राहत पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील "मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करतोय", असे म्हटले आहे.
तर नागपूर हिंसाचार प्रकरणावरून आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करताना टीका केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, नागपूरमध्ये दोन गटात वाद झाला त्याचे रूपांतर दंगलीत झाले आहे. ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे असूनही पोलिसांना याची माहिती नसल्याचे आता समोर येत आहे, अशी टीका केली आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यंनी, “नागपूरमधील दंगलीच्या घटनांमुळे शहरात तणाव निर्माण झाला. नागपूर शहराची संस्कृती सामाजिक सौहार्द टिकवून ठेवणारी आहे. पण आता येथील शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.