Latur News : काँग्रेसचे नेते हे लोकसभेत बोलू दिले जात नाही, म्हणून बाहेर ओरड करतात. मुळात त्यांना बोलण्यापासून कोणीच रोखलेले नाही. पण सभागृहात बोलताना काही नियम पाळावे लागतात, नियम सोडून कोणी बोलत असेल तर त्याचा माईक बंद केला जातो. विरोधक सभागृहात आणि सभागृहाबाहेर सातत्याने गोंधळ घालून देशाच्या विकास कामात अडथळा आणत आहेत, अशी टीका सामजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणे 'बच्चों का खेल नही' असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला.
काँग्रेस आणि त्यांचे खासदार हे देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवत आहेत. दिल्लीत एआय परिषद घेऊन देशाची मान जगभरात उंचावण्याचे काम सरकारने केले. या परिषदेला काँग्रेसने केलेला विरोध हा बालिशपणाचा होता. काँग्रेस पक्ष सत्तेविना अस्थिर झाला आहे, बेचैन झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातून अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. राहुल गांधी असेच वागत राहणार असतील तर त्यांच्या पक्षाला फार भविष्य नसेल.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर याची सखोल चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी केवळ आमदार रोहित पवार यांची नव्हे, तर आमचीही आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. अजितदादा हे महाराष्ट्रातील अतिशय मोठे नेते होते. त्यांचा कोणीतरी घात केला, अशी शंका घेणे चुकीचे होईल.
हा अपघातच आहे. पण, तो कोणाच्या चुकीमुळे झाला, व्हीएसआर कंपनीचे खराब विमान त्यांना का दिले गेले? दृष्यमानता नव्हती तर विमान उतरवण्याचा प्रयत्न का झाला? अशा विविध विषयांची चौकशी करून माहिती जनतेसमोर आली पाहीजे. मात्र, या घटनेवरून कोणी राजकारण करू नये, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका प्रभाग पद्धतीने झाल्या. म्हणून आम्हाला यश आले नसल्याने प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. ही पद्धत रद्द करून पून्हा वॉर्ड पद्धत आणावी, अशी आमची मागणी आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्याना दिले जाणार आहे. प्रसंगी यासंदर्भात आमची न्यायालयात जाण्याचीही तयारी असल्याचे आठवले यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर जावेत, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यावर, शरद पवार हे ज्येष्ठ व एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी राज्यसभेवर यायला हवे. पण, ते यापूर्वीच ‘एनडीए’ सोबत केंद्रात आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते, असेही आठवले म्हणाले.
मी राज्यसभेवर जाणार हे मला आधीच माहीत आहे, असे सांगून आठवले म्हणाले, महाराष्ट्रात सात जागांवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यातील चार जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. प्रत्येकी एक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. सातवी जागा ही मविआला असणार आहे. त्यांच्यात एकमत झाले नाही किंवा त्यांच्यात काही बिघाड झाला तर सातवी जागाही आम्ही निवडून आणू शकतो, असा दावाही आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.