
संगमनेर कीर्तनावेळी झालेल्या गोंधळामुळे संग्रामबापू महाराजांवर हल्ला आणि वाहनावर दगडफेक झाली.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट आरोप झाले.
आता कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने राज्यात नवा वाद उफाळला आहे.
Sangamner News : संगमनेरमधील कीर्तनावरून राज्यात वाद उफाळला आहे. येथे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच अखंड हरिनाम सप्ताहात संग्रामबापू महाराज यांच्यावर हल्ला झाला. तर संग्रामबापू महाराज यांनी राजकीय भाष्यासह हिंदू-मुस्लिम विधान केल्याने गोंधळ उडाला. या गोंधळात महाराजांना धक्काबुक्की करत जमावाने वाहनावर हल्ला केला होता. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच आता नवा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता खळबळ उडाली असून काँग्रेस देखील आक्रमक झाली आहे.
प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देताना, आम्हाला आता नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सध्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे.
कीर्तनकार भंडारे यांना झालेली धक्काबुकी आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर झालेली दगडफेकीच्या निषेधार्थ भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोर्चा काढला होता. यानंतर आता हिंदुत्ववादी कीर्तनकार भंडारे यांचा हा धमकी देणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ भंडारे यांनी, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागेल, अशी धमकी थोरात यांना उद्देशून दिली आहे. ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण असून काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. संग्राम भंडारे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
या धमकीनंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी, थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. हे योग्य नाही. असे होत असताना राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? असा सवाल आमचा गृहमंत्र्यांना आहे.
एक कीर्तनकार आता उघडपणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी असेल तर योग्य नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमक सरकार दाखवणार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच राज्यातील एका जेष्ठ नेत्याला अशा पद्धतीने जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे म्हणजे सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी देखील हल्लाबोल केला आहे. त्यांनी, ट्वीट करताना, बंधुभाव, एकोपा जपणारे विचार संतांनी महाराष्ट्रात मांडले आणि कीर्तनकारांनी हेच विचार आजवर पुढे नेले. पण स्वतःला कीर्तनकार समजणाऱ्या संग्राम भंडारे यांनी संयमी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली. असे धाडस स्वतःला कीर्तनकार समजणारा व्यक्ती करूच कसा शकतो? असा सवाल केला आहे.
प्रश्न 1: संगमनेरमध्ये काय घडलं?
👉 कीर्तनावेळी संग्रामबापू महाराजांवर हल्ला झाला आणि जमावाने वाहनावर दगडफेक केली.
प्रश्न 2: बाळासाहेब थोरात यांचं नाव का चर्चेत आलं?
👉 आरोप आहे की त्यांच्यामुळेच हा प्रकार घडला.
प्रश्न 3: नवा वाद कोणत्या कारणाने पेटला?
👉 कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने नवा वाद निर्माण झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.