Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत कुठेच युती करायची नाही. त्याशिवाय मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या, मूळ ओबीसी उमेदवार नसलेल्या ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या,अशा सूचना कोअर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील आमदार, खासदारांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी बैठकीत शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झाला असल्याची चर्चा रंगली आहे.
या बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नकोच असे पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता, तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी द्यायची. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या रणनितीचा आता पक्षाला किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले आहे, हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, दुसरीकडे ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटला विरोध होत आहे. त्यामुळे सध्या राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.