
Sangamner News: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील वादाच्या ठिणगीमुळे राज्यात चर्चेत आलेल्या संगमनेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल खताळ जायंट किलर ठरले होते. आता याच आमदार खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच संगमनेर येथील विजयानंतर तेथील मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करतानाच खताळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे गुरुवारी (ता.28) संगमनेरमध्ये एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले असताना त्यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला चढवला.ही घटना खांडगाव येथे घडली. यावेळी संबंधित व्यक्तीनं हात मिळवण्याच्या बहाण्यानं त्यांच्यावर हल्ला केला.
पण सुदैवानं मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर येत आहे. पण आता या हल्ल्यामुळे संगमनेरमधलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटलं आहे.
आमदार अमोल खताळ यांनी या घटनेनंतर आपल्या समर्थकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केलं आहे. तसेच या हल्लेखोरांविषयीची माहिती पोलिसांकडे मागितल्याचं समोर येत आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदवत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, अशा इशाराही दिला आहे.
विखे म्हणाले, असे भ्याड करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असा काहींचा गैरसमज आहे, पण तो दूर करायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, मात्र त्यांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील घुलेवाडी इथं कीर्तन सुरू असताना कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली, तेव्हा स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला आणि महाराजांनी अभंगावर बोलावं, असं म्हणत मागणी केली होती. यानंतर या वादाला राजकीय स्वरुप प्राप्त झालं.
कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला होता. त्यावेळी संग्राम भंडारे यांचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.त्यात कीर्तनकार भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी 'मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावे लागेल' असा इशारा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.