
Chhagan Bhujbal News: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पाचे स्वागत आहे. आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सामान्यांना मोठा दिलासा दिला. देशातील सर्व घटकांना तो उपयुक्त ठरेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचं ऐतिहासिक निर्णय घेतल्याने देशातील सर्वसामान्य मध्यम वर्गाला अतिशय मोठा दिलासा मिळाला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजीमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ(Chhagan Bhujbal)यांनी म्हटले आहे की, देशाच्या विकासाला गती देत असताना सर्वसमावेशक विकासाला चालना देणे, खासगी क्षेत्राला गुंतवणुकीला प्रोत्साहन व देशातील उदयोन्मुख मध्यमवर्गीय नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञानासह , शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य, पर्यटन, उद्योग यांसह इतर क्षेत्रांसंबंधित महत्वाच्या घोषणा झाल्या. कृषी क्षेत्र, तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यातून देशाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
तसेच, अर्थसंकल्पात नवीन करप्रणालीनुसार प्राप्तीकराच्या टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या करप्रणालीनुसार १२ लाखांपर्यतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही. ही अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. करप्रणाली नुसार ० ते ४ लाख रुपये उत्पन्न- कर नाही,४ ते ८ लाख रुपये उत्पन्न- ५ टक्के कर,८ ते १२ लाख रुपये उत्पन्न- १० टक्के कर, १६ ते २० लाख रुपये उत्पन्न- २० टक्के कर, २० ते २४ लाख रुपये किंवा त्यावरील उत्पन्न- ३० टक्के कर असणार आहे. तसेच टीडीएस मर्यादा १० लाख रुपये करण्यात आली आहे, ज्याचा मध्यवर्गीय नोकरदारांना सर्वाधिक फायदा होणार असल्याचेही भुजबळांनी म्हटले आहे.
याचबरोबर, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला देखील बळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा राज्यातील युवकांना निश्चितच फायदा होणार आहे. असंही छगन भुजबळ म्हणाले.
याशिवाय, नारीशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या MSME महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना आणली जाणार, पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद केल्याने महिला उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट, ५० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे.'
तसेच ३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्याने वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होणार असल्याचे म्हटले आहे.अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या वस्तू-सेवा स्वस्त होतील. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला(Maharashtra) त्याचा फायदा होणार आहे. असं भुजबळ म्हणाले.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशातील शेतकरी वर्गाला अधिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. अर्थसंकल्पात(Budget) शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली असून या अर्थसंकल्पातून देशाला विकासाला अधिक गती मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.