Manikrao Kokate News: राज्याचा कृषी विभाग अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. विशेषत: यापूर्वी या खात्याचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले होते. त्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या हा विषय देखील होता. त्यामुळे हे मंत्री चर्चेत राहिले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेले काही दिवस वादात सापडले आहेत. यांच्या त्या वादांचीच चर्चा फार झाली. त्यात मंत्री कोकाटे यांच्या वेगळ्या प्रयोगाकडे दुर्लक्ष झाले. कृषिमंत्री कोकाटे यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने कृषी विभागातील साफसफाईला सुरुवात होईल, असेही म्हणता येईल.
कृषिमंत्री कोकाटे यांनी पुणे येथे या विभागातील अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. कृषी विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी विविध सूचना आणि चर्चा झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यापुढे लॅपटॉप देण्याचा वेगळा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे बदली आणि मंत्री यांचे नाते सर्वश्रुत आहे. यापूर्वी या खात्याचा कारभार बीड आणि नाशिकच्याच मंत्र्यांकडून पाहिला जात होता. त्यांनी घेतलेल्या बदल्यांच्या निर्णयाला मॅटमध्ये थेट आव्हान देण्याचे प्रकार घडले. संदर्भात मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती. एका माजी मंत्राचे तर चक्क बदल्यांचे `रेट कार्ड` समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यात किती सत्यता होती, हे स्पष्ट नाही.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री कोकाटे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो, हे अप्रत्यक्ष मान्य केले आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचे अधिकार आता कृषी सचिव आणि आयुक्तांना देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आपण लक्ष घालणार नसल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले आहे.
बदल्या हे कर्मचाऱ्यांचे सततचे दुखणे असते. त्यावर कृषीमंत्र्यांनी फुंकर घातली आहे. हे सांगतानाच कृषिमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि प्रशासकीय स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची ही जाणीव करून दिली. शेतकऱ्यांसाठी काम करा असा कडू डोस कृषीमंत्र्यांनी यावेळी दिला.
कृषिमंत्री कोकाटे यांची कार्यशाळा या निमित्ताने एक वेगळा प्रयोग म्हटला पाहिजे. प्रशासकीय कामकाज आणि कर्मचाऱ्यांची कार्यशैली यावर यापूर्वी क्वचितच थेट मंत्र्यांनी भाष्य केले असावे. त्या दृष्टीने कृषिमंत्री कोकाटे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडलेल्या कृषी मंत्र्यांचा हा वेगळा प्रयोग अनेकांच्या नजरेतून सुटला असे म्हणता येईल.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.