
Nashik News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रविवारी नाशिकला आगमन झाले. यावेळी त्यांनी आपल्या परखड स्वभावानुसार प्रतिक्रिया दिली. आगामी काळात छगन भुजबळ यांच्या विषयी धोरण स्पष्ट केले. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत. या संदर्भात भुजबळ यांनी देखील वेळोवेळी तसेच संकेत दिले आहेत, यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी भुजबळ यांना थेट सुनावले.
आम्ही देखील पाच वेळा आमदार होतो. आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही. त्यावेळी भुजबळ मंत्री झाले. मात्र, आम्ही नाराज झालो नव्हतो. आम्ही दुःखही व्यक्त केले नाही. आम्हाला संधी मिळाली आहे. पक्ष नेत्यांनी ही संधी दिली. मग भुजबळ यांच्या पोटात दुखण्याचे काय कारण, असा थेट सवाल कृषी मंत्री कोकाटे यांनी केला. (Manikrao Kokate News)
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे रविवारी शासकीय विश्रामगृहावर अतिशय उत्साहात समर्थकांनी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले मला मनापासून आनंद आहे. कृषिमंत्री ही फार मोठी जबाबदारी आहे. वारंवार होणारे वातावरणातील बदल असतील किंवा शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम असेल विजेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अन्य सुविधा यावर मी काम करणार आहे. हे मोठे आव्हान आहे मात्र त्याला मी आत्मविश्वासाने सामोरा जाईल. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, असे चांगले काम शेतकऱ्यांसाठी राज्यात उभे करेल, असा दावा त्यांनी केला आहे.
ज्या वेळी शेतीचे प्रश्न निर्माण होतील. जे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळेल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री कोकाटे यांनी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले. अजित पवार (Ajit Pawar) यांचा वादा पक्का असतो, असे मी अनेकदा सांगितले आहे. ते एक कमिटेड राजकीय नेते आहेत. ते एखादा निर्णय घेताना मागेपुढे पाहत नाहीत. त्यांनी संधी दिल्यामुळे सिन्नरचे मतदार अजित दादांवर प्रचंड खुश आहेत, असा दावा त्यांनी केला.
बारामती मतदारसंघाविषयी वेगळी स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मी अजित पवार यांना सिन्नर मतदारसंघ मोकळा करून देतो, असे सांगितले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री भुजबळ यांना मंत्री करण्यासाठी कोणी शब्द दिला होता असा प्रश्न त्यांनी केला.
आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत लगेच कुठे पळून चालले आहेत. राज्यसभा आहे आणि अन्य देखील पर्याय अद्याप शिल्लक आहेत. मंत्रीपदे मर्यादित असतात, त्यामुळे सगळ्यांना संधी मिळेल असे नाही. सरकार स्थापन होऊन आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी थोडा दम धरला पाहिजे. मला जे वाटते तेच जगात होईल, असे कधी होत नसते, अशा शब्दांत त्यांनी भुजबळ यांना स्पष्ट इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.