Nashik Politics : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२३) उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व असल्याने भाजपचाच सभापती होणार हे निश्चित आहे. शिवाय भाजपसोबत सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी देखील आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा राहणार आहे.
स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पैकी सर्वाधिक ९ सदस्य भाजपचे नियुक्त झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ४ व राष्ट्रवादीचे १ सदस्य समितीवर आहेत. उर्वरित दोन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेला ९ चा आकडा भाजपकडे आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोधच होईल असे दिसत आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून भाजपने महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी जी खबरदारी घेतली होती तीच खबरदारी भाजप स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी घेणार असल्याचं कळतं आहे.
महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी फोडाफोडीच्या भीतीने भाजपने आपल्या सर्व ७२ नगरसेवकांना शहरातीलच एका पंचतारांकित हॉटेलला हलवले होते. निवडणुकीच्या दिवशी सकाळी सर्व नगरसेवकांना महापालिकेत आणण्यात आले होते. आताही भाजपने सावध पावले उचलली आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी भाजपतर्फे स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्यानंतर सावधगिरीचा भाग म्हणून भाजपचे ९ सदस्य सहलीला रवाना होणार असल्याचे वृत्त समजते आहे. त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या ४ व राष्ट्रवादीच्या एका सदस्यालाही सहलीला पाठवले जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती संभापतिपदासाठी बुधवारी (दि. २५ ) फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी अकरा वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणुकीची विशेष सभा होईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.२३) सकाळी ११ ते ३ पर्यंत मुदत दिली गेली आहे.
सभापतिपदाच्या उमेदवारीसाठी भाजपतर्फे मच्छिंद्र सानप यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय माधुरी बोलकर व दीपाली कुलकर्णी यांचीही नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुकेश शहाणे हे देखील सभापतिपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, भाजपच्या मच्छिंद्र सानप यांना लॉटरी लागण्याची शक्यता अधिक आहे. कारण त्यांनी पक्षादेश पाळत उपमहापौरपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यांना त्याची बक्षीसी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.