

Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपने एकट्याने शंभर प्लसचा नारा दिला होता. त्यादृष्टीने पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग करण्यात आलं. अनेक प्रभागात निष्ठावान इच्छुकांना डावलून आयारामांना संधी देण्यात आली त्यातून पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपमधून सात जणांनी बंडखोरी केली आहे.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या सात माजी नगसेवकांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवली आहे. तसेच सरचिटणीस अमित घुगे यांनी देखील अपक्ष उमेदवारी करीत मनपा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. परंतु या बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने या बंडखोरांना अभय दिलेले असून परतीचे दार खुले ठेवले असेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर बंडखोरांपैकी कोणी निवडून आल्यास त्यांना परतीचे दरवाजे खुले ठेवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे बंडखोरी करणाऱ्यांनीच राजीनामे दिले आहे. राजीनामा दिला असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई किंवा हकालपट्टीची आवश्यकताच नसल्याची प्रतक्रिया भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नाशिकची महापालिका निवडणुक जिंकता यावी यासाठी भारतीय जनता पक्षाने स्थानिक आमदारांचा विरोध डावलून अनेक दुसऱ्या पक्षातील दिग्गज व मात्तबर नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिले. त्यानंतर त्यांना उमेदवारीही दिली. महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडेच होती. उमेदवारीसाठी तब्बल १, ०७७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आपल्याच पक्षात इतके इच्छुक असल्यासे पाहाता भाजपने महायुतीमधील आपल्या मित्र पक्षांसोबत महायुतीची चर्चाच केली नाही. भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने दोघांनी मिळून युतीची घोषणा केली त्यातून भाजपचा स्वबळाचा मार्ग आपोआप मोकळा झाला.
१२२ जागांवर भाजपला उमेदवार द्यायचे होते. इच्छुकांची संख्या हजारात होती. त्यात आयारामांनाही शब्द देऊन ठेवले असल्याने उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे पक्षातील प्रमुख नेत्यांची उमेदवारी वाटप करताना दमछाक झाली. अनेक निष्ठावान उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले.
पक्षाने ऐनेवेळी उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी केली. या बंडखोरांना रोखण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलं असलं तरी जवळपास सात इच्छुकांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यांची बंडखोरी रोखण्यात पक्षाला अपयश आलं. मात्र, बंडखोरी नंतर संबंधितांवर हकलपट्टीची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, पक्षांकडून अशा प्रकारची कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सगळ्यांसाठी परतीचे दार उघडे असून निवडणूक झाल्यानंतर हे सात बंडखोर पुन्हा कमळावर स्वार होतील असे स्पष्ट होते.
या सात जणांनी केली बंडखोरी
माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह माजी नगरसेवक शशिकांत जाधव, मुकेश शहाणे, रुची कुंभारकर, अंबादास पगारे, मीरा हांडगे व सुनीता पिंगळे यांचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. या सर्वांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. तर मुर्तडक हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहे. त्यामुळे मुर्तडक हे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.