Nashik News : केंद्र सरकारकडून नेहमीच शेतकरी, युवा वर्ग, नारी शक्तीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देत नेहमीच सन्मान करण्यात आला आहे. या वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे आहे. त्यासोबतच गेल्या पाच वर्षाच्या काळात शेतकरी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी सरकरने दिला आहे. यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळात शेतकरी वर्गासाठी खोटे पॅकेज घोषित केले जात होते. ते दिले जात नसल्याचा आरोप पीएम नरेंद्र मोदी यांनी केला.
नाशिक येथील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), दिंडोरी येथील उमेदवार भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारासाठी पीएम मोदींची (Narendra Modi) सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. (Narendra Modi News)
नाशिकचा हा भाग कांदा व द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध असलेला भाग म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारने आतापर्यंत वर्षाला 7 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली आहे. कांद्याची निर्यात पाच वर्षांत 35 टक्के केली आहे. आतापर्यंत 22 लाख टन कांदा निर्यात केला आहे.
त्यासोबतच शेतकरी वर्गाचा कांदा शिल्लक राहू नये व योग्य भाव मिळावा म्हणून येत्या काळातही मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार असल्याचे पीएम मोदींनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी सभास्थळी पीएम मोदींचे भाषण सुरु झाल्यानंतर काही वेळातच कांद्यावर बोलावे, यासाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळीचे वातावरण चांगलेचे तापले होते. मात्र, काही वेळातच या कांद्याच्या विषयावर भाष्य करीत पीएम मोदींनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.