Jalgaon news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणूक आढावा बैठक मुंबईत झाली. यावेळी जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मधील घोटाळा कारणीभूत ठरल्याची तक्रार केली.
जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जळगाव मधील राजकीय स्थितीची मांडणी केली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाला पक्षातील विसंवाद आणि ईव्हीएम मधील घोटाळा कारणीभूत असावा असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. अनेक उमेदवारांना त्याचा धक्का बसला आहे. मात्र जळगाव व राज्यातील या पराभूत मनोवृत्तीतून तातडीने बाहेर पडले पाहिजे. पक्षाच्या आगामी विस्ताराचा विचार करून कार्यक्रम आखावेत, अशी मागणी यावेळी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून उमेदवारांचे काम केले. त्यांच्यासाठी जीवाचे रान केले. आपली ताकद पणाला लावली, याची जाणीव उमेदवारांनी ठेवावी. आता विधानसभेच्या उमेदवारांनी मेहेनत घेण्याची वेळ आली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पक्षाने नवी रणनीती आखावी. राज्य पिंजून काढावे. आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
सत्ताधारी पक्षाकडून काहीही प्रचार झाला, तरी राज्यात निवडणुकीनंतर अराजकता निर्माण झाल्यासारखे चित्र आहे. जनता त्यामुळे सत्ताधारी आघाडीवर नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना नक्की संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांनी उमेदवारांना बळ दिले. आता आगामी निवडणुकीसाठी जे तरुण विधानसभा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहण्याची जबाबदारी विधानसभेतील उमेदवारांची आहे. त्यासाठी पक्षाने राज्य आणि जिल्ह्याच्या कार्यकारणीत बदल करावे. तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यावी म्हणजे पक्षाला नवे बळ मिळेल.
यावेळी माजी मंत्री अरुण भाई गुजराती, डॉ सतीश पाटील, दिलीप खोडपे सर, किशोर पाटील, रमेश पांढरे, डिके दादा पाटील, शांताराम पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.