
Manmad APMC News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या गटात गेल्या काही महिन्यांपासून संघर्षं सुरु आहे. कांदे गटाने भाजपला धक्का देण्याची जोरदार तयारी केली आहे. बाजार समितीत सत्तांतर घडवून आणण्यासाठी विद्यमान भाजपचे सभापती दीपक गोगड यांच्याविरोधात कांदे गटातील १२ संचालकांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सुरुवातीला बाजार समितीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा एक गट व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा एक गट अशी स्थिती होती. या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होता. मात्र भुजबळ यांच्या गटातील विद्यमान सभापती दीपक गोगड व काही सदस्यांनी आणि गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यातीलच काहींनी गोगड यांच्याविरोधात अविश्वास दाखवला व सुहास कांदे यांच्या नेतृ्त्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्या गटात संघर्ष पेटला आहे.
बाजारसमितीच्या १८ संचालकांपैकी १२ संचालक हे शिवसेना सुहास कांदे यांच्या गटाकडे असल्याने कांदेंचे पारडे जड आहे. त्यामुळे सभापती गोगड यांच्याकडे आता बहुमत राहिलेले नाही. त्यामुळे दोन-तृतीयांश बहुमताच्या आधारावर सादर केलेला ठराव जर मंजूर झाला, तर गोगड यांचे पद जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी विरोधी गटात प्रवेश केल्यामुळे अल्पमतात आलेल्या गोगड यांचे अधिकार काढण्याची मागणी विरोधी गटाने केली. प्रभारी जिल्हाधिकारी पारधे व त्यानंतर उपनिबंधकांकडे मागणी करुनही त्यावर कार्यवाही न झाल्याने आता थेट १२ सदस्यांनी गोगड यांच्याविरोधात त्वरीत अविश्वास ठरावाची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आणि जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक श्री. मुलाणी यांच्याकडे सादर केला. यावेळी विरोधी आघाडीचे माजी आमदार व विद्यमान संचालक संजय पवार, किशोर लहाने यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १२ संचालक उपस्थित होते. बाजार समितीच्या सत्तेची गणितं आता बदलण्याच्या मार्गावर आहेत. रमेश कराड यांची संचालक म्हणून नुकतीच झालेली निवड ही देखील महत्वाची ठरणार आहे.
दरम्यान या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच बैठक बोलवण्याची शक्यता आहे. हा ठराव मंजूर झाल्यास गोगड यांचे पद जाणे निश्चित मानले जात आहे. तर, आमदार कांदे यांच्या गटाला बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात महायुतीमधील शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष युती म्हणून सोबत असले तरी स्थानिक पातळीवरील गणितं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद, बैठका व राजकीय कुरघोडींमुळे बाजार समितीमधील राजकीय वातावरण तापलं आहे. यामधील काही प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय व पणन संचालकांपुढे सुरु आहे. त्यामुळे यासर्व न्यायालयीन निर्णयांचा प्रभाव देखील राजकीय घडामोंडीवर निश्चितच पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.