

Gondia News: चार दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्री तसेच गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यानंतर नाईक यांनी लगेच रविवारी (ता.2 नोव्हेंबर) गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या ऐकून घेतल्या. झालेल्या नुकसानीची पुरेपूर मदत देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री टिकत नाही. सहा वर्षांत पाच पालकमंत्री बदलले. पालकमंत्री पर्यटनाला येतात, कार्यकर्त्यांना भेटत नाही अशाही तक्रारी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही नाराजी राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यांनी शेजारच्याच यवतमाळ येथील इंद्रनील नाईक यांनी गोंदियाचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे.
इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया या तालुक्यांमधील अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. जिल्ह्यातील 900 गावे बाधित झाली असून 29 हजार 50.40 हेक्टर शेती क्षेत्र बाधित आहे. या अंतर्गत 60 हजार 73 शेतकरी बाधित झाले आहेत.
दिवाळीच्या आधी व नंतर झालेल्या पावसामुळे बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानंतर 339 गावांचे पंचनामे पूर्ण झाले होते, मात्र पुन्हा झालेल्या पावसामुळे फेरपंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान मिळालेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याची कार्यवाही थांबवावी, अशा स्पष्ट सूचना नाईक यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या.
शेतकऱ्यांना व कास्तकारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. नाईक पुढे म्हणाले, बाधित क्षेत्रातील 30 टक्के पीक विक्रीस परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार आहे. या वेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी माझ्यासोबत उपस्थित राहावे असेही सांगितले.
राज्यातील सर्वाधिक धान उत्पादन असलेला गोंदिया जिल्हा सर्वाधिक नुकसानाला सामोरा गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक तालुक्यात नुकसानाचे प्रमाण वेगवेगळे असले तरी शासन या संदर्भात योग्य ते निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.
ई-पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.